Bhuvneshwar Kumar : ‘भारतासाठी पुन्हा खेळायला आवडेल, पण…’ पुनरागमनाबाबत भुवनेश्वर कुमारचं मोठं वक्तव्य
आयपीएलच्या रणांगणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलग दोन मोसम आपल्या स्विंगच्या जादूने प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे.

Bhuvneshwar Kumar : आयपीएलच्या रणांगणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलग दोन मोसम आपल्या स्विंगच्या जादूने प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासून टीम इंडियाबाहेर असलेल्या भुवीने प्रदीर्घ काळानंतर आपल्या मनातील खंत, संघातून बाहेर पडतानाचा धक्का आणि पुनरागमनाची तीव्र इच्छा यावर उघडपणे भाष्य केले आहे. क्रीडा समालोचक जतीन सप्रू यांच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
नोव्हेंबर २०२२ मधील न्यूझीलंड दौऱ्यानंतर भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावला. त्या काळात नेमकं काय घडलं, याचा उलगडा करताना तो (Bhuvneshwar Kumar) म्हणाला, “न्यूझीलंड दौऱ्यानंतर मला संघ व्यवस्थापनाकडून एक फोन आला होता. त्यांच्या बोलण्यावरून मला वाटले की आगामी दोन मालिकांसाठी माझ्या नावाचा नक्की विचार होईल. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.
अर्थात, ते फार त्रासदायक ठरले नाही, कारण पडद्यामागे काय सुरू आहे याची मला जाणीव होती आणि मी ते वास्तव स्वीकारले होते. त्या कठीण काळात माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला.”
या मुलाखतीत भुवीने २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील त्या कटू आठवणीलाही उजाळा दिला. ॲडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये प्रचंड शांतता आणि निराशा पसरली होती.
त्या क्षणाचा उल्लेख करताना भुवी म्हणाला, “पराभवानंतर मी थेट हॉटेलच्या खोलीत गेलो आणि पत्नी नुपूरला फोन लावला. मी तिला स्पष्टपणे सांगितले की, भारतासाठी हा कदाचित माझा शेवटचा विश्वचषक ठरला आहे. मोठ्या स्पर्धांमधील अशा पराभवानंतर निवड समिती भविष्याचा विचार करून संघात मोठे बदल करते, हा माझा पूर्वानुभव होता आणि त्यांचा तो निर्णय योग्यही होता.”
संघाबाहेर राहूनही भुवीने (Bhuvneshwar Kumar) आपली धार कमी होऊ दिली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना आयपीएल २०२५ मध्ये त्याने १७ बळी टिपले, तर आयपीएल २०२६ मध्ये तर त्याने फलंदाजांवर अक्षरशः कहर केला. अवघ्या १७.८९ च्या सरासरीने तब्बल २८ गडी बाद करत त्याने विक्रमी तिसऱ्यांदा ‘पर्पल कॅप’ पटकावण्याच्या उंबरठ्यावर धडक मारली होती. अवघ्या एका विकेटने त्याची ही संधी हुकली असली, तरी त्याच्या या अचूक माऱ्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या संभाव्य पुनरागमनाबाबत अत्यंत परिपक्व शब्दांत भुवीने भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “मी आता मैदानावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळत नाही. कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर मी आहे जिथे संघातून वगळले तरी माझ्यावर कोणताही मानसिक परिणाम होणार नाही.
पण हो, भारताची निळी जर्सी घालून पुन्हा एकदा देशासाठी मैदानात उतरायला मला नक्कीच आवडेल.” आयपीएलमधील या धमाकेदार पुनरागमनानंतर आता निवड समितीचे दार भुवीसाठी (Bhuvneshwar Kumar) पुन्हा उघडणार का? याकडे अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.






