Bhimashankar Temple : ३१ मे उजाडला तरी सस्पेन्स कायम! भीमाशंकर मंदिर सुरू होणार की नाही? व्यावसायिकांचा जीव टांगणीला
Bhimashankar Temple : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेले साडेचार महिने बंद; भाविकांची वर्दळ थांबल्याने पुणे-नाशिक आणि मंचर-भीमाशंकर मार्गावरील बाजारपेठ ठप्प.

Bhimashankar Temple – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पावणे-पाच महिन्यांपासून बंद असल्यामुळे शेकडो हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मंदिर विकासकामांमुळे भाविकांची वर्दळ पूर्णपणे थांबल्याने या व्यवसायांचे उत्पन्न जवळपास शून्यावर आले आहे. ३१ मेपासून मंदिर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
परंतु त्याला अधिकृत दुजोरा नसल्याने हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांचा मंदिर केव्हा सुरू, होईल या बाबत जीव टांगणीला लागला आहे. पुणे–नाशिक रस्त्यासह मंचर–भीमाशंकर, राजगुरुनगर–भीमाशंकर आणि जुन्नर–सावरगाव मार्गे घोडेगाव–भीमाशंकर या प्रमुख मार्गांवरील विशेषतः हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेकांनी हॉटेल सुरू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उचल देऊन कामावर ठेवले होते. या परिस्थितीत काही हॉटेल व्यवसायिकांना कर्मचारी कमी करावे लागले, तर काहींनी तात्पुरते हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिक स्तरावर बेरोजगारीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत मंदिराच्या सभामंडपाच्या डोमचे काही काम आणि मंदिराच्या पायरी मार्गावरील छताचे अच्छादनाचे काही काम अपूर्ण अवस्थेत दिसत आहे. ३१ मे रोजी मंदिर पुन्हा सुरू होण्याची शक्यता असली तरी गेले काही महिने व्यवसायिकांनी मोठे आर्थिक नुकसान सहन केले आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“मंदिर बंद असल्याने ग्राहकच नाहीत, त्यामुळे हॉटेल चालवणे अशक्य झाले. कर्मचाऱ्यांना अनेक हॉटेल चालकांनी उचल दिली आहे. पण उत्पन्न बंद असल्याने त्यांना सांभाळणे कठीण झाले.आता मंदिर सुरू झाल्यावरच परिस्थिती सुधारेल.”
– कमलेश वळसे पाटील, हॉटेल ब्ल्यू मॉरमन, कारकुडी पालखेवाडी.
“मंदिर बंद राहिल्याने ग्राहकच नसल्याने हॉटेल व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार, देखभाल खर्च आणि कर्जाचे हप्ते भरणे अत्यंत कठीण झाले आहे.”
– बाबाजी निघोट,हॉटेल नटराज निघोटवाडी-मंचर.


