प्रभात वृत्तसेवा भिगवण – गेल्या तीन महिन्यांपासून तक्रारवाडी ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या खुर्चीवर अखेर प्राजक्ता सचिन वाघ यांचे नाव कोरले गेले आहे. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत फक्त एकच उमेदवार म्हणून त्यांनी नामनिर्देशन पत्र भरल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.आज सकाळी दहा ते अकरा या वेळेत नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली. मात्र या वेळेत फक्त प्राजक्ता वाघ यांनीच अर्ज दाखल केल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भिगवण मंडल अधिकारी लक्ष्मीकांत मुळे यांनी काम पाहिले. गेल्या काही महिन्यांपासून तक्रारवाडीत सरपंच पदासाठी रंगलेला राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. तक्रारवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आणि त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले, मात्र त्यातही त्यांना अपयश आले. परिणामी सरपंच पदासाठी नव्याने निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता वाघ यांनी उमेदवारी दाखल केली आणि कोणताही विरोधक उभा न राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. तीन महिन्यांपासून चाललेला ‘खुर्चीचा संघर्ष’ अखेर संपुष्टात आला. एकेकाळी जिवलग मित्र असलेले मात्र राजकारणाच्या वावटळीत एकमेकांसमोर उभे ठाकले हे तक्रारवाडीतील ग्रामस्थ विसरू शकले नाहीत. प्राजक्ता वाघ यांच्या बिनविरोध निवडीमुळे तक्रारवाडी ग्रामपंचायतीत नव्या नेतृत्वाची नांदी झाली असून, गावातील राजकीय समीकरणे नव्याने रंगण्याचे संकेत दिसत आहेत.