Bharatshet Gogawale : केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या जी-रामजी योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना जुन्या सर्व संबंधित योजनांचा त्यात समावेश केला जाईल, तसेच या प्रक्रियेत एकाही रोजगार सेवकाला कामावरून कमी केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत रोजगार हमी योजनेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना गोगावले बोलत होते. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार जी-रामजी योजनेचे स्वरूप व्यापक करण्यात आले आहे. ही योजना लागू करताना जुन्या योजनांचे अस्तित्व संपणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने सर्व जुन्या योजना या नव्या आराखड्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने योजनांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता येणार आहे, असे मंत्र्यांनी सांगितले. नव्या योजनेमुळे कर्मचारी कपात होईल, अशी चर्चा कामगार वर्गात होती. यावर स्पष्टीकरण देताना मंत्री गोगावले यांनी सांगितले की, प्रशासकीय बदलांमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा येणार नाही. सर्व अनुभवी रोजगार सेवकांना नव्या योजनेत सामावून घेतले जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो रोजगार सेवकांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातील विकासकामांना या नव्या योजनेच्या माध्यमातून अधिक गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.