Team India : ‘प्रशिक्षक राहुल द्रविडला भारतरत्न देऊन सन्मानित करावं’; दिग्गज खेळाडूची केंद्र सरकारकडे मागणी…

Rahul Dravid & Bharat Ratna : गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार होता. मात्र रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या विनंतीवरून त्याने आणखी काही महिने मुख्य प्रशिक्षकपदी राहण्याचा निर्णय घेतला होता. द्रविडला माहित नव्हते की तो फक्त 7 महिन्यांनंतर टी-20 विश्वचषक ट्रॉफी उचलणार आहे. आता अखेर द्रविडने चांगल्या आठवणी घेऊन प्रशिक्षकपदावरून निवृत्ती घेतली आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. द्रविडला भारतरत्न पुरस्कार देण्यामागे सुनील गावसकर यांनी कारणेही सांगितली आहेत.
गावस्कर यांनी भारत सरकारला विनंती करताना म्हटले आहे की, “केंद्र सरकारने राहुल द्रविडला भारतरत्न देऊन सन्मानित केले तर ते योग्य होईल आणि तो त्यास पात्र आहे. कारण, तो एक महान खेळाडू आणि कर्णधार होता. त्या काळात वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकणे सोपे नव्हते पण त्याने राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमध्ये प्रसिद्ध मालिका जिंकली. तो विजय खूप महत्त्वाचा होता. इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या तीन भारतीय कर्णधारांपैकी द्रविड एक आहे. तसेच नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नवीन प्रतिभेला जोपासण्यात त्याने उत्तम कामगिरी केली आणि वरिष्ठ संघाच्या उत्कृष्ट प्रशिक्षकपदाची कामगिरी त्याने उत्तमप्रकारे निभावली आहे.”
त्यामुळे मला वाटते की, भारत सरकारने भारतरत्न देऊन द्रविडचा सन्मान करायला हवा. भारतरत्न, राहुल शरद द्रविड हे असे बोलायलाही खूप छान वाटते. वृत्तसंस्था ‘मिड-डे (Mid-Day) साठी लिहिलेल्या लेखात गावस्करांनी ही मागणी केली आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये द्रविडचे योगदान…
राहुल द्रविड हा एक महान खेळाडू होता, परंतु निवृत्तीनंतर 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा मार्गदर्शक असताना त्याच्या प्रशिक्षक कारकिर्दीला सुरुवात झाली. 2015 मध्ये, त्यांची अंडर-19 आणि भारत-अ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली 19 वर्षाखालील संघ 2016 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही, मात्र 2 वर्षानंतर टीम इंडियाने ट्रॉफी उचलताना ही कसर भरून काढली. या काळात त्याने ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन या भावी स्टार्सना तयार केले. अखेरीस पुढे 2019 मध्ये त्यांना वरिष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
यंदा भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षानी टी-20 वर्ल्डकप जिंकला. या विजयाचे शिल्पकार बरेच जण असले तरी शांत डोक्याने सर्व काही विचार करत गेमप्लान करणाऱ्या प्रशिक्षक राहूल द्रविडचा वाटा हा यात खुप जास्त आहे. तसेच द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्याच वर्षी एशिया कप जिंकला होता. तसेच क्रिकेटपटू म्हणूनही त्याने भारताकडून चांगली कामगिरी केली आहे.
द्रविडची वैयक्तिक कारकिर्द….
द्रविडच्या वैयक्तिक कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 164 कसोटी सामन्यांमध्ये 13,288 धावा केल्या. त्याने 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 धावा केल्या आहेत. द्रविडच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारांहून अधिक धावा आहेत आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये तो जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 48 शतके आणि 146 अर्धशतके आहेत. याशिवाय त्याने अनेकदा गरजेवेळी भारतीय संघासाठी यष्टीरक्षक म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे.





