इंदूर :- भारत जोडो यात्रेमुळे आपल्या स्वत:मध्ये काही बदल घडून आल्याचे आपल्याला जाणवत आहे असे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आता आपल्यातील संयमाची क्षमता आणखी वाढली असून इतरांचे ऐकण्याची क्षमताही वाढली आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या यात्रा काळातील आपला सर्वात समाधानकारक क्षण कोणता होता असे विचारले असता, राहुल गांधी म्हणाले की, असे अनेक क्षण आहेत. त्यातून माझा संयम नाट्यमयरित्या वाढला आहे. दुसरं म्हणजे, आता मला आठ तासाच्या अवधीतही चिडचिड होत नाही, कुणी ढकललं किंवा खेचलं तर त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, पूर्वी दोन तासांच्या अवधीतच आपली चिडचिड व्हायची असे ते म्हणाले.
जर तुम्ही यात्रेत फिरत असाल आणि लोकांच्या वेदना अनुभवत असाल तर तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, आता तुम्हाला केवळ हार मानता येणार नाही असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले तिसरे म्हणजे, इतरांचे ऐकण्याची माझी क्षमता देखील आता चांगली वाढली आहे.
National Sculpture Award : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना ‘राष्ट्रीय शिल्प पुरस्कार’ प्रदान
राहुल गांधींनी असेही सांगितले की, जेव्हा त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली तेव्हा त्यांना जुन्या दुखापतीमुळे गुडघ्यात वेदना जाणवत होती, पण ही व्याधी आता बरी झाली आहे, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले. या गुढघा दुखीमुळे आपण खूप अस्वस्थ होतो. यात्रा पूर्ण करता येईल की नाही अशी भीतीही सतावत होती असे ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी यात्रेतील काही भावुक क्षणही पत्रकारांपुढे नमूद केले. लोकांच्या प्रतिसादाच्या विविध अनुभवाबद्दलही त्यांनी माहिती दिली.