पुणे जिल्हा | भामा आसखेड 90 टक्के भरले; भामा नदीत विसर्ग

चाकण, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण 90 टक्के भरले आहे. धरण परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढत असल्याने धरण प्रशासनाने रविवारी (दि. 4) सकाळी 10 वाजेपासून धरणाचे चारही दरवाजे उघडून 3086 क्युसेकने भामा नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे. दरम्यान, धरणातून विसर्ग सुरू करणार असल्याची माहिती शनिवारी (दि. 3) माहिती देऊन नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
चाकण एमआयडीसीला वरदान ठरलेल्या भामा आसखेड धरण परिसरात जुलै महिन्यात व 2 ऑगस्ट पासून होत असलेल्या संततधार पावसामुळे धरण 90 टक्के भरले असून धरणाची पाणी पातळी 6.90 टीएमसीवर पोहोचली आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता 8 टीएमसी असून धरण परिसरात आजपर्यंत एकूण 940 मिमी पाऊस पडला आहे.
धरणातील पाणीसाठ्याने जून महिना अखेरीस निच्चांकी पातळीवर म्हणजेच अवघा 1 टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. पावसाने ओढ दिली असती तर चाकण एमआयडीसीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले असते. दरम्यान अल्पावधीतच धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नागरिक, शेतकरी व उद्योजकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धरण परिसरात होत असलेली पावसाची संततधार व धरणक्षेत्रातून पाण्याचा होत असलेला येवा पाहून धरणाचे चारही दरवाजे उघडून रविवारी सकाळी 10 वाजता सुरुवातीला 3086 क्युसेकने विसर्ग सुरू होता त्यानंतर तासाभरातच हा विसर्ग 6200 क्युसेकने वाढवण्यात आला.
मागील वर्षी जुलै अखेर धरण परिसरात एकूण 447 मीमी पाऊस पडला होता तर धरणात 75 टक्के पाणीपातळी होती. परंतु यावर्षी जुलै महिन्यात पाऊस धो धो बरसला आणि पावसाचे प्रमाण असेच राहिले तर पुढील 2 ते 3 दिवसांत धरण 100 टक्के पूर्ण क्षमतेने भरेल. – निलेश देशमुख-घारे, शाखा अभियंता




