Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. बंगालमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी भाजपने एक मोठी रणनीती आखली असून, इतर राज्यांतील अनुभवी नेत्यांना ‘प्रवासी सदस्य’ म्हणून मैदानात उतरवले आहे. पक्षांतर्गत कलह मिटवणे आणि बूथ स्तरावर संघटना मजबूत करणे, ही मुख्य जबाबदारी या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. अनुभवी नेत्यांवर मोठी जबाबदारी बिहारमधील विजयाने उत्साहित झालेल्या भाजपने बंगालमध्ये कोणताही धोका पत्करायचा नाही, असे ठरवले आहे. यासाठी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना पाचारण करण्यात आले आहे. हे नेते मंडल स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत पक्षाच्या निवडणूक तयारीवर लक्ष ठेवणार आहेत. महत्वाची जबाबदारी असलेले नेते: जेपीएस राठोड (उत्तर प्रदेश मंत्री): यांच्याकडे पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूरमधील ३५ विधानसभा जागांची जबाबदारी आहे. सुरेश राणा (माजी मंत्री, युपी): उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील २८ जागांची जबाबदारी. त्यांनी नुकताच ‘संदेशखाली’चा दौरा करून तेथील स्थितीचा आढावा घेतला. संजय भाटिया (हरियाणा भाजप सरचिटणीस): हुगळी, श्रीरामपूर आणि हावडा शहराचे प्रभारी म्हणून कार्यरत. कैलाश चौधरी (राजस्थान भाजप): उत्तर बंगालमधील कूचबिहार, जलपाईगुडी आणि सिलिगुडी या पट्ट्यात पक्षाची धुरा सांभाळत आहेत. हे सर्व नेते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्य प्रभारी सुनील बन्सल यांना आपला अहवाल सादर करत आहेत. भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी स्थानिक मदतीचा हात बंगालमध्ये पाठवण्यात आलेले बहुतांश नेते हिंदी भाषी आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि लोकांशी संवाद साधताना अडचण येऊ नये म्हणून त्यांच्यासोबत स्थानिक बंगाली नेत्यांची ‘दुभाषी’ (Translator) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ५% मतांचे गणित आणि ‘कायस्थ’ कार्ड २०२१ च्या निवडणुकीत भाजपला ३७.९७% मते मिळाली होती, तर तृणमूल काँग्रेसला ४८.०२% मते मिळाली होती. यंदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपला आपला मतांचा टक्का किमान ५ टक्क्यांनी वाढवावा लागणार आहे. तसेच, पक्षाने नितीन नबीन यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवल्याने बंगालमधील ७८ जागांवर प्रभाव असलेल्या ‘कायस्थ’ समाजाची मते आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २०२१ च्या तुलनेत यंदा भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा आणि या बाहेरील राज्यांतील चाणक्यांची फौज ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात किती यशस्वी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.