बीड पुन्हा हादरले ! राख वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक; सरपंचाचा जागीच मृत्यू

Beed News | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच बीड जिल्ह्यात एका सरपंचाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकीला धडक दिल्याने सौंदना गावचे सरपंच अभिमान क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालकाला पकडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अभिमान क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परनं धडक दिली. यावेळी अभिमन्यू क्षीरसागर जोरात धडक बसल्याने रस्त्याच्या कडेला पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. Beed News |
अपघात की घात ?
सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सरंपच क्षीरसागर यांचा मृतदेह परळी येथील जिल्हा रुग्णालयात शवविछेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे. Beed News |
त्यानुसार हा अपघात की घात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता आणखी एका सरपंचाचा भरधाव टिप्परनं दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:





