बीड : बीडचे नेते योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेत्या पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कमळ हाती घेतले. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात क्षीरसागर यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभा करून बीड नगर परिषदेत सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे कारण सांगून क्षीरसागर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या विजयाच्या गणितात अडथळा येणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप प्रवेशानंतर क्षीरसागर यांची प्रतिक्रिया भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश क्षीरसागर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नेत्या पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीत आहोत. भाजपाच्या कमळ चिन्हावर आम्ही निवडणूक लढवणार आहोत.” नगराध्यक्ष पदावर आरक्षण आणि रणनीती बीडमध्ये नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याचे सांगत क्षीरसागर म्हणाले, “त्या प्रवर्गातील उमेदवार आम्ही कमळ चिन्हावर देणार आहोत. भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना सोबत घेऊन त्यांची आणि आमची संघटनात्मक शक्ती एकत्र करून निवडणूक लढवू.” राष्ट्रवादीत त्रास, भाजपमध्ये मोकळा श्वास भाजपमधील जबाबदारीविषयी ते म्हणाले, “बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी आमच्यावर आहे. सध्या बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील. तिकडे (राष्ट्रवादीत) काहीतरी त्रास होता, मात्र इकडे (भाजपमध्ये) आलो तर मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे.” भाजपची विचारधारा बळकट करण्याचा निर्धार आगामी काळात बीड तालुक्यात भाजपची विचारधारा दृढ करण्यासाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचा निर्धार क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “बीड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा अधिक उंच फडकावा यासाठी मी अखंड प्रयत्नशील राहणार आहे. बदलासाठीचा हा प्रवास अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचे सहकार्य माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”