Baba Siddiqui : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी सारख्या बड्या नेत्याने राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय खळबळ उडाली आहे.
राजीनाम्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला गुड लक, असं म्हटलं आहे. बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांनी सध्या तरी याबाबत खुलासा केलेला नाही. पण आपण ज्या पक्षात जाणार त्या पक्षाची ताकद वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, असं बाबा सिद्दीकी म्हणाले आहेत.
यावेळी पत्रकारांनी बाबा सिद्दीकी यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारण विचारलं असता ते म्हणाले, “ज्या परिवारात मी इतके वर्ष राहिलो त्यामध्ये मी अनेक मुद्द्यांवर बोलत राहिलो. त्याबाबत इथे पत्रकार परिषदेत बोलणं मला योग्य वाटत नव्हतं. काहीतरी झालं असेल म्हणून मी या कुटुंबातून निघतोय. मला ते इथे सांगणं योग्य वाटत नाही. माझ्या काँग्रेसला शुभेच्छा आहेत”, असं बाबा सिद्दीकी यावेळी म्हणाले.
बाबा सिद्दीकी यांची सोशल मीडिया पोस्ट !
ते म्हणतात…. ’मी माझ्या तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो. मागच्या 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मी काँग्रेस का सोडत आहे, याबाबत माझं मत मला व्यक्त करायला खूप आवडलं असतं.
पण ते म्हणतात ना की काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. तसंच आहे, या राजीनाम्याबाबत मी फारसं काही बोलणार नाही. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो..’ या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.