नवी दिल्ली – भारतात पुढील वर्षी होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली होती. त्यावर ताशेरे ओढताना भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अशा धमक्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले आहे. योग्यवेळी केंद्र सरकार त्यावर निर्णय घेणार असून, पाकिस्तान मंडळाच्या या ब्लॅकमेलला बीसीसीआयही चोख उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान मंडळाला मिळाले असले तरीही भारतीय संघ पाकमध्ये जाऊन या स्पर्धेत खेळणार नाही, असे काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटले होते. त्यानंतर पाक मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारताला धमकी देताना भारतातच होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार नाही, असा इशारा दिला होता.
तसेच आयसीसी व आशिया क्रिकेट समितीच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रत्येक सदस्य देशाला खेळावेच लागते, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते. मग जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन आशिया स्पर्धेत खेळणार नसेल तर त्यांच्यावरही अशीच कारवाई झाली पाहिजे, असेही राजा यांनी म्हटले होते. त्यावर ठाकूर यांनी राजा यांचे मत हास्यास्पद असून भारतीय संघावरच जागतिक क्रिकेट अवलंबून आहे, त्यामुळे पाकच्या अशा धमक्यांना भीक घालण्याची गरज नाही, अशा शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
BCCI च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर आता ‘या’ संघटनेच्या अध्यक्षपदासाठी गांगुली इच्छुक
भारतात होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत जगातील सर्व प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान मंडळाच्या या ब्लॅकमेलला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांनी जो इशारा दिला आहे, त्यावर बीसीसीआय उत्तर देईल. 2023 सालचा एकदिवसीय विश्वकरंडक भारतातच होणार आहे. आशिया करंडक मात्र अन्यत्र देशात आयोजित करणेही भाग पडेल, असेही ते म्हणाले. पाक मंडळाचे काय मत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी द्यायची की नाही हे भारतातील केंद्र सरकार ठरवते त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, असेही ठाकूर म्हणाले.