Asian Games India : एशियन गेम्ससाठी जपानला भारताचा मुख्य संघ जाणार नाही? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Asian Games India : आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या राहण्याच्या आणि इतर व्यवस्थांवरून बीसीसीआय आणि एसीसी अत्यंत नाराज आहेत.

BCCI And ACC Unhappy With Asian Games Facilities In Japan India May Send B Team : जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games) खेळाडूंच्या राहण्याच्या आणि इतर व्यवस्थांवरून बीसीसीआय आणि एसीसी अत्यंत नाराज आहेत. आयोजकांनी केलेल्या अत्यंत सुमार दर्जाच्या सुविधांमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताचा मुख्य संघ पाठवण्याऐवजी ‘B’ संघ पाठवण्याचा गंभीर विचार बीसीसीआय करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
टेंटमध्ये ड्रेसिंग रूम अन् ५०० मीटर लांब वॉशरूम; जपानमधील गैरसोयींचा पर्दाफाश –
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील गैरव्यवस्थांवर एसीसीच्या बैठकीत थेट आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मैदानावर खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम थेट टेंटमध्ये उभारण्यात आल्या असून, खेळाडूंना वॉशरूमसाठी तब्बल ५०० मीटर लांब जावे लागत आहे. याशिवाय खेळाडूंना राहण्यासाठी दिलेल्या हॉटेलमधील खोल्यांचा आकार अत्यंत लहान असल्याने खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत आहे. या सर्व कारभाराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी बीसीसीआय लवकरच आपला एक निरीक्षक (Observer) जपानला पाठवणार असून, त्यांच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
२४ सप्टेंबरपासून रंगणार पुरुष क्रिकेटचे सामने –
🔴BCCI UNHAPPY WITH ASIAN GAMES FACILITIES 🤯
– BCCI & ACC are reportedly not satisfied with the facilities in Japan for the Asian Games.
– Dressing rooms are reportedly set up in tents.
– Washrooms are around 500 metres away from the dressing rooms.
– Hotel rooms are… pic.twitter.com/3sM2WXhIAE
— Sam (@cricsam02) August 28, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचे सामने १७ ते २२ सप्टेंबरदरम्यान खेळवले जातील, तर पुरुष क्रिकेटचे सामने २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहेत. सुविधांमध्ये त्वरित सुधारणा न झाल्यास मुख्य खेळाडूंचा दौरा रद्द करून पर्यायी ‘B’ संघाला मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी बीसीसीआयने केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना योग्य सुविधा न मिळणे हे क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत धक्कादायक मानले जात आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर; बदलाची शक्यता –
बीसीसीआयने या स्पर्धेसाठी यापूर्वीच भारतीय संघाची घोषणा केली असून, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, इशान किशन यांच्यासह १५ वर्षीय युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशीचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, जपानमधील परिस्थिती समाधानकारक न आढळल्यास या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते आणि नवीन दुय्यम संघ जपान दौऱ्यावर पाठवला जाण्याची दाट शक्यता आहे.





