Bangladesh elections: गेल्या १८ महिन्यांपासून अराजकता, हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेला बांगलादेश आज इतिहासाच्या एका निर्णायक वळणावर उभा आहे. उद्या, गुरुवारी १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशातील जनता नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी क्रांतीनंतर आणि शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ सत्तेच्या पतनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असून, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ९ लाख सुरक्षा जवान तैनात – निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी बांगलादेश सरकारने कंबर कसली असून संपूर्ण देशात तब्बल ९ लाख सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ४३,००० मतदान केंद्रांपैकी २४,००० केंद्रे ‘संवेदनशील’ किंवा ‘अतिसंवेदनशील’ घोषित करण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी पहिल्यांदाच ड्रोन आणि २५,००० बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. पोलीस महानिरीक्षक बहारुल आलम यांनी स्पष्ट केले की, ढाका शहरातील बहुतांश केंद्रे जोखमीच्या श्रेणीत आहेत, जिथे लष्कराची विशेष नजर असेल. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार – जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आरक्षणाविरुद्ध सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने उग्र रूप धारण केले, ज्यामध्ये १४०० हून अधिक लोकांचा बळी गेला. शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला आणि त्यानंतर नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, हा १८ महिन्यांचा काळ बांगलादेशसाठी सोपा नव्हता. या काळात हिंदूंवरील हल्ले, मॉब लिंचिंग आणि कट्टरपंथी शक्तींचा उदय यामुळे देशात चिंतेचे वातावरण राहिले. हिंदू अल्पसंख्याक संघटनांच्या मते, या संघर्षात अनेक हिंदूंचा बळी गेला असून हजारो घरांवर हल्ले झाले आहेत. मतदाराला एकाच वेळी दोन मते द्यावी लागणार- या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मतदाराला एकाच वेळी दोन मते द्यावी लागणार आहेत. पहिले मत ३०० संसदीय जागांसाठी लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी असेल, ज्यासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका वापरली जाईल. तर दुसरे मत संवैधानिक जनमत चाचणीसाठी असेल, ज्यामध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर प्रस्तावित केलेल्या ८४ कलमी सुधारणा आराखड्यावर मतदारांना ‘हो’ किंवा ‘नाही’ असा कौल द्यायचा आहे. यासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका दिली जाईल. ‘आवामी लीग’वर निर्बंध – दशकानंतर प्रथमच शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक होत आहे. त्यांच्या ‘आवामी लीग’वर सध्या अनेक निर्बंध असल्याने मुख्य लढत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात मानली जात आहे. तारिक रहमान १७ वर्षांच्या वनवासानंतर मायदेशी परतले असून त्यांनी लोकशाही आणि कायद्याचे राज्य पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी जमात-ए-इस्लामीने ११ पक्षांची मोठी आघाडी तयार केली आहे. उद्या सकाळी ७:३० वाजल्यापासून १२.७ कोटी मतदार आपले भवितव्य ठरवतील. यात ८ लाख प्रवासी बांगलादेशींना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार असून, बांगलादेश आता उदारवादी लोकशाहीच्या मार्गावर चालणार की कट्टरपंथीयांच्या प्रभावाखाली जाणार, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल. हेही वाचा: सुनेत्रा पवारांची मोदी-शहांशी भेट ते भारत-अमेरिका व्यापार करारात मोठे बदल… वाचा आजच्या टाॅप बातम्या