Pune Ajit Pawar Program : अमरावती येथे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचे पडसाद पुण्यात पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील जाहीर कार्यक्रमात शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यांच्या भाषणाला जोरदार विरोध करत अमरावतीतील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. हा गोंधळ तीव्र झाल्याने काही काळासाठी कार्यक्रम थांबवावा लागला. या घटनेची सर्वत्र मोठी चर्चा केली जात आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जमाफी कुठे आहे?’, ‘शेतकरी अजूनही अडचणीत!’ अशा घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. अमरावती जिल्ह्यातील मोझेगाव येथे बच्चू कडू गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. काल मात्र, त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. या पार्श्वभूमीवर पुण्यातील कार्यक्रमात शेतकरी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांनी कर्जमाफीसाठीच्या मागणीवर आक्रमक पवित्रा घेतला. अजित पवार काय म्हणाले? मी शेतकऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहे, पण असे आंदोलन आणि गोंधळ योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांनी संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचार करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट बोलण्यास टाळल्याने कार्यकर्त्यांचा रोष वाढला. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ थांबत नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत सभागृहातून या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. सर्वांना स्वारगेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा: सोन्याच्या भावात पुन्हा ऐतिहासिक वाढ ; ओलांडला १ लाखाचा टप्पा, वाचा किती झाली नेमकी किंमत ?