Bacchu Kadu: राजकीय वर्तुळामध्ये हालचाली ! बच्चू कडूंनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत; नेमकं काय म्हणाले? पाहा…

Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू हे आपल्या रोखठोक भूमिकांमुळे कायमच राजकारणात चर्चेचा विषय बनलेले असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊनही ते बऱ्याचदा महायुतीच्या विरोधात भूमिका घेताना दिसले आहे. आता त्यांनी थेट तिसऱ्या आघाडीचेही संकेत दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कडू यांच्या भूमिकेमुळे महायुतीला धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचा प्रत्यत पावसाळी अधिवेशनात आला. कारण अधिवेशनात त्यांनी महायुती सरकारवर आगपाखड केली. पण आता एका प्रसार माध्यमाला मुलाखत देताना त्यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे.
19 जुलै रोजी महायुती सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार असणार आहे. इतकेच नाही तर मी माझी जागा महायुतीला देणार, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी ते महायुतीत आहेत की नाही, याबाबतचेही स्पष्टीकरण दिले आहे.
मी महायुतीत आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले. मी महायुतीत नाही. आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू, असे त्यांनी सांगितले. ज्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचे हे संकेत तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.





