India Women vs Australia Women One-Off Test Day 1 Stumps | ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिली मालिका, म्हणजेच एकमेव कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून 98 धावा केल्या आहेत. स्मृती मानधना आणि स्नेह राणा क्रीजवर आहेत.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला…
मुंबईत कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 19 षटकांत एक विकेट गमावून 98 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 121 धावांनी मागे आहे, पण त्याच्या नऊ विकेट शिल्लक आहेत. स्मृती मानधना 49 चेंडूत 43 धावांवर तर स्नेह राणा आठ चेंडूत चार धावा करून नाबाद आहे. शेफाली वर्मा 59 चेंडूत 40 धावा करून बाद झाली. ऑस्ट्रेलियाकडून जेस जॉन्सनने एकमेव विकेट घेतली.
A solid opening day with the bat and ball 😎#TeamIndia finish the day with 98/1, trailing by 121 runs 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/7o69J2XRwi#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KWQwe6jZ7o
— BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2023
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 219 धावांवर आटोपला…
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला पहिला डाव 77.4 षटकात 219 धावांवरच आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात लहान धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात फलंदाजीत ताहिला मॅकग्राने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त कर्णधार अॅलिसा हिलीने 75 चेंडूत 38 धावाची तर बेथ मुनी हिने 94 चेंडूत 40 धावांची खेळी केली. किम गर्थ 28 धावा करून नाबाद परतली. याशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.
भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्राकरने 16 षटके टाकत 53 धावा देताना सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर स्नेह राणा हिने 22.4 षटकात 56 धावा देत तीन बळी घेतले. दीप्ती शर्मा हिने 19 षटकात 45 धावा खर्च करताना 2 बळी घेतले. तर आॅस्ट्रेलियाची एक फलंदाज धावबाद झाली.
अशाप्रकारे पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारतीय महिला संघाचे वर्चस्व राहिले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून आघाडी घ्यायला आवडेल आणि ऑस्ट्रेलियावर विजयाची नोंद करण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल.