भवानीनगर – भवानीनगर आणि परिसरातील बॅंकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने खातेदारांची गैरसोय होत आहे. आज (दि.23) गोकुळाष्टमीनिमित्त सुट्टी असल्याने कित्येक नागरिकांना पैशांची गरज भासत होती. शनिवार असल्याने काही बॅंका दुपारीच बंद झाल्याने पैसे काढण्यासाठी एटीएम शिवाय पर्याय नसल्याने अनेक ठिकाणी गर्दी दिसत होती. परंतु, युनियन बॅंक, महाराष्ट्र बॅंक तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक या तीनही बॅंकांच्या एटीएममध्ये खडखडाट होता. यामुळे या बॅंकेच्या ग्राहकांनी याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
इंदापूर आणि बारामतीच्या वेशीवर असलेले भवानीनगगर हे मोठे गाव असल्याने तसेच आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने येथे बॅंकांनी एटीएम सुरू केले आहेत. मात्र, शनिवार, रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी हे एटीएम रिकामेच असल्याचे अनेकदा समोर आले आहे. येथील तीनही बॅंकांच्या एटीएममध्ये कायम अशीच अवस्था असते. याबाबत संबंधीत बॅंकांच्या खातेदारांनी या बॅंकांकडे तक्रारी केलेल्या आहेत. परंतु, बॅंकांतील अधिकारीऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
भवानीनगर परिसरात साधारण चाळीस गावे येतात. या चाळीस गावातील नागरिकांना पैसे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भवानीनगर आहे. येथील या तीनही बॅंकांचे एटीएम मशीन आहे. परंतु, त्यात पैसे नसतात तर काही एटीएम बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे कित्येक नागरिकांना बचत खात्यावर पैसे असूनही ते वेळेत मिळत नसल्याने अनेक महत्त्वाची कामे खोळंबत आहेत. बॅंका एटीएममध्ये पैसे का ठेवत नाहीत, असा प्रश्न खातेदार विचारत आहेत. एटीएम मशीनचा खातेदारांना म्हणावा तसा फायदा होता नाही याउलट मनस्तापच अधिक होत आहे. याबाबत संबंधीत बॅंकांनी गांभीर्याने विचार करून एटीएममध्ये पैसे ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.