Indian Currency : आता ATM मधून निघणार १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा; केंद्र सरकारची नवी योजना काय? पाहा…
केंद्र सरकार 10, 20 आणि 50 रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यावर भर देत आहे.

Indian Currency : सुट्ट्या पैशांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना सुरु करण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला रोजच्या व्यवहारात जाणवणारी सुट्या पैशांची कमतरता दूर करण्यासाठी आता केंद्र सरकार 10, 20 आणि 50 रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची ( Indian Currency ) उपलब्धता वाढवण्यावर भर देत आहे. नोटबंदीनंतर जवळपास दशकभरानंतरही हा प्रश्न कायम असल्याने सरकार विविध तांत्रिक पर्यायांवर काम करत आहे.
काय आहेत नवे प्रस्ताव?
एका प्रसिद्ध वृत्तानुसार, मागणीनुसार 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा देणारी विशेष मशीन विकसित करण्याचा विचार सुरू आहे. यासोबतच ‘हायब्रिड एटीएम’चा प्रस्तावही चर्चेत असून, या एटीएमद्वारे मोठ्या नोटा बदल्यात लहान नोटा आणि नाणी मिळू शकतील. तसेच, रिझर्व्ह बँकेकडून लहान मूल्याच्या नोटांची छपाई वाढवण्याबाबतही विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईत पायलट प्रोजेक्टअंतर्गत चाचणी सुरू :
एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, लहान नोटा देणाऱ्या मशीनच्या प्रोटोटाइपची मुंबईत पायलट प्रोजेक्टअंतर्गत चाचणी सुरू आहे. यशस्वी ठरल्यास ही यंत्रणा रेल्वे स्थानकं, बाजारपेठा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये बसवली जाईल.
हे देखील वाचा : India Post Recruitment 2026 : परीक्षा नाही, मुलाखतही नाही..! सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, लवकर अर्ज करा
हायब्रिड एटीएम कसे काम करणार?
हा एटीएम पारंपरिक एटीएम आणि कॉइन वेंडिंग मशीनचा संयोग असेल. युजर्स मोठ्या नोटा टाकून त्याऐवजी लहान नोटा व नाणी मिळवू शकतील. आरबीआयने याआधी मुंबईतील बँक ऑफ बडोदा शाखेत या मॉडेलची चाचणी केली आहे.
गरज का भासते?
500 रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे न मिळाल्याने दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही अडचणी येतात, व्यवहार रखडतात आणि वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे नागरिकांना रोजच्या जीवनात याचा मोठा फायदा होणार आहे.
चलनातील स्थिती :
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, चलनातील नोटांपैकी 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 41.2%, तर मूल्याच्या दृष्टीने त्यांचा वाटा 86% आहे. याउलट, 2 ते 50 रुपयांच्या नोटांचा एकूण मूल्यामध्ये वाटा फक्त 3.1% इतकाच आहे.
तज्ञ काय सांगतात ?
‘भारत रेटिंग्स अँड रिसर्च’चे मुख्य अर्थशास्त्री देवेंद्र पंत यांच्या मते, लहान नोटांची उपलब्धता वाढल्यास विशेषतः ग्रामीण भागातील व्यवहार सुलभ होतील. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते केवळ मशीन नव्हे, तर नोटांची छपाई आणि पुरवठा साखळी मजबूत करणंही तितकंच आवश्यक आहे.
ही बातमी वाचा…






