मांडवगण फराटा, (वार्ताहर)- शिरूर तालुक्यातील माझी स्वच्छ प्रतिमा, लोकप्रियता, प्रत्येकाच्या सुख- दुःखात सहभागी, प्रत्येक गावात व्यक्तिशः संपर्क यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मागितली आहे. यासाठी मी प्रबळ दावेदार आहे. विजय निश्चित आहे. मलाच उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते, संचालक दादा पाटील फराटे यांनी दिली. दरम्यान फराटे यांनी शिरूर विधानसभेसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी तोफ डागली आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. फराटे म्हणाले की, कारखान्यातील कामगार मृत्युमुखी पडला तर एक दिवसाचा पगार कामगार त्या व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यासाठी देतात.मृत कामगारांचे चार ते पाच वर्षाश्रद्ध होऊनही एक रुपयाही मिळाला नाही. हा पैसा गेला कुठे हा याचे उत्तर आमदार अशोक पवार यांनी दिले पाहिजे. गेली पंचवीस वर्षे एक हाती सत्ता अशोक पवार यांच्या कडे असताना कारखाना तोट्यात गेलाच कसा? त्यांचा खाजगी कारखाना जोरात चालू असून घोडगंगा कारखाना बंद कसा काय पडतो. यावेळी राजकीय जीवनातील ३८ वर्षाची कारकीर्दविषयी उजाळा देऊन ते म्हणाले की, शिरूर तालुक्यातील बाप्पूसाहेब थिटे, संभाजी काकडे, पोपटराव गावडे, निवृत्तीआण्णा गवारी, दत्तूआण्णा ढमढेरे, बाबुराव पाचर्णे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे राजकीय प्रवास केला आहे. स्वतःसाठी कधीही काहीही मागितले नाही. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर नेहमीच चांगले राजकीय संबंध राहिले आहेत. लाडकी बहीणचा लाभ होणार ते म्हणाले की, केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. लोकाभिमुख अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यात महिलांना फायदा होणार आहे. चालू आर्थिक बजेटमध्ये सरकारने सर्वांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे उमेदवार निवडून येऊन सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अजित पवारांबद्दल चुकीची माहिती फराटे म्हणाले की, घोडगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत माझ्या कामाची व प्रमाणिकपणाची प्रचिती आलेली आहे. (स्व) आमदार बाबूराव पाचर्णे यांच्याबरोबर संपूर्ण तालुका पायी पिंजून कारखानाविषयी तळमळीने वास्तव सांगितले होते. परंतु त्यावेळी कोणीही विश्वास ठेवला नाही. आज तीच वेळ येऊन कारखाना बंद पडला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. कामगारांचे पगार थकले आहेत. राज्यातील अनेक नवीन कारखाने कर्जमुक्त झाले आहेत. विरोधात गेल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार कर्ज मिळून देत नाहीत, असा चुकीची माहिती प्रसारित करायची, असा आरोप ज्येष्ठ नेते, संचालक दादा पाटील फराटे त्यांनी आमदार अशोक पवार यांच्यावर केला आहे.