India Women Semifinals : अवघ्या ३० चेंडूंत मॅच फिनिश! जपानवर दणदणीत विजय मिळवत भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल
India Women Semifinals : भारतीय महिला क्रिकेट संघाने जपानला आठ गडी राखून पराभूत करून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Asian Games 2026 India Women Beat Japan By 8 Wickets Enter Semi Finals To Face Bangladesh : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाने यजमान जपानचा ८ गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत अवघ्या ५७ धावांत गारद झाला. भारताने हे किरकोळ आव्हान केवळ ५ षटकांत (३० चेंडूंत) २ गडी गमावून सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये झेप घेतली असून पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.
श्रीचरणीचा भेदक मारा; जपानचे ९ फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद!
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जपानी फलंदाजांना भारतीय फिरकी आणि वेगवान माऱ्यापुढे डोके वर काढता आले नाही. भारताकडून गोलंदाजीत श्रीचरणीने ४ षटकांत अवघ्या १० धावा देत ४ विकेट्स टिपले. तिला उत्तम साथ देत शफाली वर्माने १३ धावांत २ गडी बाद केले, तर श्रेयंका पाटील व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. जपानकडून अयाका काटोने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर इतर ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
मानधना बॅटिंगला आलीच नाही; शफालीचे १५ चेंडूंत ४० धावांची वादळी खेळी –
𝐒𝐄𝐌𝐈-𝐅𝐈𝐍𝐀𝐋𝐒 𝐁𝐎𝐔𝐍𝐃 𝐈𝐍 𝐃𝐎𝐌𝐈𝐍𝐀𝐍𝐓 𝐒𝐓𝐘𝐋𝐄! 💥
Sree Charani’s brilliant 4/10 and Shafali Verma’s explosive 40* off 15 steer India’s run to the last four! ✨#SonySportsNetwork #AsianGames #AichiNagoya2026 #BaarBaarBharatHarBaarBharat pic.twitter.com/eTAafagUMp
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 18, 2026
प्रत्युत्तरात ५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय डावात मोठे प्रयोग पाहायला मिळाले. अंतिम अकरामध्ये असूनही स्मृती मानधना डावाची सुरुवात करण्यासाठी आली नाही. तिच्या जागी कमलिनी सलामीला आली, मात्र ती शून्यावर बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या भारती फुलमालीने ६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूल शफाली वर्माने १५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४० धावांची वादळी खेळी केली. रिचा घोषने ६ चेंडूंत नाबाद १२ धावा करून भारताला ५ व्या षटकात विजय मिळवून दिला.
२० सप्टेंबरला बांगलादेशशी सेमीफायनल; पाकिस्तान-श्रीलंका आमनेसामने!
या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटच्या अंतिम चार संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. २० सप्टेंबर रोजी भारताचा उपांत्य सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होईल. हा सामना जिंकल्यास भारताचे किमान रौप्यपदक पक्के होणार आहे.





