Asia Cup 2025 : ‘…तोच संघ विजयी ठरेल’, वसीम अक्रम यांच्या वक्तव्यानंतर IND vs PAK सामन्याची उत्सुकता शिगेला

वसीम अक्रम यांनी चाहत्यांना केले आवाहन –
पाकिस्तानचे माजी जलद गोलंदाज वसीम अक्रम यांनी आशिया कप 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत उत्साह व्यक्त केला आहे. त्यांनी खेळाडू आणि चाहत्यांना शिस्त राखण्याचे आणि ‘कठोर मेहनत व आक्रमकतेने खेळण्याचे’ आवाहन केले आहे. टेलिकॉम एशिया स्पोर्टशी बोलताना अक्रम म्हणाले, “मला खात्री आहे की हा सामना अतिशय रंजक असेल. खेळाडू आणि चाहत्यांनी शिस्त पाळावी आणि मर्यादा ओलांडू नये. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना जगभरातील अब्जावधी लोक पाहतात. त्यामुळे चाहत्यांनी शिस्तबद्ध वर्तन दाखवावे.”
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रथमच आमनेसामने येणार आहेत. अक्रम पुढे म्हणाले, “भारतीय चाहते देशभक्तीने आपल्या संघाला जिंकताना पाहू इच्छितात, तसेच पाकिस्तानी चाहतेही आपल्या देशाच्या विजयासाठी उत्सुक असतात. भारत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि या स्पर्धेत ते प्रबळ दावेदार म्हणून उतरतील. पण ज्या संघाने त्या दिवशी दबाव उत्तमरित्या हाताळला, तोच विजयी ठरेल.”
भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता –
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबर रोजी दुबईत आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 टप्प्यात 21 सप्टेंबर रोजी या दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना होण्याची शक्यता आहे. जर दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले, तर चाहत्यांना एकाच स्पर्धेत तिसऱ्यांदा हा हाय-व्होल्टेज सामना पाहण्याची संधी मिळू शकते. अक्रम यांनी पुढे सांगितले की, “आशिया कप 2025 हा जगभरातील चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. मला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा कसोटी मालिका सुरू व्हावी अशी इच्छा आहे.”
हेही वाचा – AUS vs SA : हेड-मार्श जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास! साकारली रेकॉर्ड ब्रेक भागीदारी
भारताचे गट टप्प्यातील वेळापत्रक –
या आठ देशांच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान गट-अ मध्ये असून त्यांच्यासोबत ओमान आणि यूएई हे संघही आहेत. भारत आपल्या मोहिमेला 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करेल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध भारत खेळेल. या सामन्यांमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वसीम अक्रम यांच्या संदेशाने चाहत्यांना शिस्त आणि खेळातील उत्साह यांचा समतोल राखण्याची प्रेरणा मिळाली आहे.





