Asia Cup 2023 Final : आशिया करंडकाच्या सामन्याबाबत फिक्सिंगची तक्रार; श्रीलंका क्रिकेट मंडळाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण…

कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत फिक्सिंगची तक्रार करण्यात आली आहे. सिटीझन पॉवर अगेन्स्ट ब्रायबरी करप्शन ऍण्ड वेस्टेज या नावाच्या संस्थेने कोलंबोतील पोलीस मुख्यालयात ही तक्रार दाखल केली आहे. अर्थात श्रीलंका क्रिकेट मंडळाने हा दावा फेटाळून लावला आहे.
या स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर अवघ्या 51 धावांवर गडगडला होता व भारतीय संघाने हा सामना एकही गडी न गमावता जिंकला होता. एखाद्या शाळकरी संघानेही जास्त धावा केल्या असत्या, असे सांगत या संस्थेचे अध्यक्ष सी. कामंथा तुषार यांनी श्रीलंका संघातील खेळाडूंवरच फिक्सिंगचा आरोप केला आहे.
श्रीलंका मंडळाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले असून, जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक संघ आहेत की ज्यांच्या नावावर अशा नीचांकी धावा आहेत. मग त्या सगळ्याच सामन्यांना फिक्सिंग म्हणायचे का, असा उलट सवालही श्रीलंका मंडळाने या संस्थेला केला आहे.
भारताची गोलंदाजी जास्त अचूक झाली व त्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज साफ अपयशी ठरले, हे मान्य, परंतू त्यांनी हा सामना फिक्स केला, असे म्हणणे अयोग्य आहे. आमचा खेळाडूंवर पूर्ण विश्वास असून, येत्या काळात ते यशस्वी होतील, असा विश्वासही श्रीलंका मंडळाने व्यक्त केला आहे.
तपास, चौकशीची गरज नाही…
कोलंबो पोलीस मुख्यालयात जरी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असली तरीही श्रीलंका क्रिकेट मंडळाने याबाबत चौकशी किंवा तपास करण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करताना या संस्थेने केवळ पराभवानंतरच्या निराशाजनक मानसिकतेतूनच ही तक्रार केल्याचे म्हटले आहे. तसेच अद्याप कोलंबो पोलिसांनीही यावर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.





