नवी दिल्ली – राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला कॉंग्रेस पक्षाचे काही आमदार गैरहजर होते. त्यावरून त्यांना म्हणजे 9 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावण्यात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका वाहिनीशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. छोट्या गोष्टीवरून गदारोळ केला जात असल्याचे त्यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.
चव्हाण म्हणाले अदल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी आम्ही मतदान केले होते. मग 24 तासांनंतर असे काय होणार होते? विश्वासदर्शक ठरावाच्या मतदानाच्या दिवशी आम्ही काही मिनिटे उशीरा पोहोचलो आणि अध्यक्षांच्या आदेशानुसार सभागृहाची दारे बंद करण्यात आली. आम्ही लॉबितच अडकलो होतो व त्याच वेळी अध्यक्षांनी आम्ही पत्र लिहून पाठवले होते. मी अनेक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये असून अत्यंत निष्ठेने काम करतो आहे. माझ्याबाबत असे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. माझ्या कर्तव्यनिष्ठेबाबत शंका घेतली जाऊ नये आणि पक्षश्रेष्ठींनाही हे चांगले ठाऊक आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी ज्या आमदारांनी क्रॉस व्होटींग केले त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. पक्षाबाबत आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, कोणाची पक्षाविरूध्द काही तक्रार असेल तर त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्याद्वारे प्रश्न सोडवला पाहिजे. तसेच अन्य प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अजुनही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सोबतच आहेत व राज्यात महाविकास आघाडी कायम आहे.
महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय प्रदेश कॉंग्रेस कमिटी घेईल. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या दिवशी सगळे स्पष्ट होईल. तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जर विधानसभा अध्यक्ष पदावर असते तर चांगले झाले असते की वाईट हे त्यांना विचारा असेही चव्हाण यांनी नमूद केले.
कटकारस्थानाने सरकार पाडले; सर्वोच्च न्यायालयाचा निकालच भविष्य ठरवेल…