Ashadhi Wari: ‘देह दंग सावळ्याच्या अंगणी…’! लाखो भाविकांच्या साक्षीने माउलींचे पहिले उभे रिंगण उत्साहात
Ashadhi Wari: ज्ञानोबा-तुकाराम आणि पंढरीनाथाच्या जयघोषात तरडगावजवळ रंगला भक्तीचा रंगोत्सव; २७ दिंड्यांच्या उपस्थितीत अश्वांनी मारली नेत्रदीपक दौड.

Ashadhi Wari – ‘रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंग सावळ्याच्या अंगणी’ या भक्तीगीताचा प्रत्यय देणारा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत चांदोबाचा लिंब येथे आज गुरुवारी पार पडला. टाळ- मृदंगांंच्या गजरात विठ्ठल…विठ्ठल नामाच्या उद्घोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज तरडगावजवळ दुपारी 5 वाजता पार पडले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दीड दिवसांच्या विश्रांतीनंतर आज लोणंद येथून मार्गस्थ झाला.
सकाळपासूनच लाखो वारकरी व भाविक तरडगाव मुक्कामी रवाना होत होते. लोणंद येथे माउलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. यावेळी गावकरी वाजत गाजत बँड लावून माउलींचा नैवेद्य आणून दाखवतात. दुपारी दोन वाजता माउलींच्या रथाने चांदोबाचा लिंबकडे प्रयाण केले. दुपारी साडेचार वाजता माउलींचा रथ चांदोबाच्या लिंब येथे आल्यावर लाखो वारकरी व भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.
ज्ञानोबा माउली, तुकारामाच्या जयघोघाषात सर्व भाविक भक्तीभावाच्या महासागरातून बुडून गेले होते. तत्पूवी पालखी सोहळ्याचा खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. कापडगाव येथील सरहद्दीवर असलेल्या कापडगाव येथील सरहद्देच्या ओढ्यावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,
स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे उपस्थित होते. पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर साऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण. रिंगणाच्या उत्सुकतेने वारकऱ्यांची पावले भराभर चांदोबाच्या लिंबकडे पडत होती.
रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. रस्त्याकडील बाजूला असणाऱ्या शेतामध्ये ठिकठिकाणी भारुड व कीर्तन रंगले होते. माउलीचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला असता गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतून हजारो वारकरी दुतर्फा झाले.
अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली. दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालून वातावरणात अधिक प्रसन्नता आणली होती. रिंगण लावल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माउलीच्या अश्वाचे व मानाच्या अश्वाचे आगमन झाले. ज्ञानोबा माउली- तुकाराम व पंढरीनाथाच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते.





