Ashadhi Wari: पालखी सोहळ्यासाठी आळंदी सज्ज! १८०० मोबाईल टॉयलेट्स, भव्य पार्किंग अन् पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Ashadhi Wari: खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी नगरपरिषदेत पूर्वनियोजन बैठक संपन्न; मागील वर्षांतील त्रुटी सुधारण्यावर भर.

Ashadhi Wari – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी यात्रा पालखी प्रस्थान सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पूर्वनियोजन बैठकीत वारीसाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट झाले. खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व विकासकामे, दुरुस्तीची कामे आणि आवश्यक सुविधा 30 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीला आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, यात्रा समितीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक-नगरसेविका, पोलीस, आरोग्य, वीज, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वारी काळात भाविकांच्या सेवेसाठी आळंदी नगरपरिषदेकडून 17 अधिकारी, 200 कर्मचारी, 150 स्वयंसेवक, 15 पाण्याचे टँकर, 20 सक्शन मशिन्स, 10 घंटागाड्या आणि 3 अग्निशमन वाहने तैनात करण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी 1,800 मोबाईल टॉयलेट्स आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये 600 आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महिलांसाठी विशेष ‘पिंक टॉयलेट’ आणि इंद्रायणी घाट परिसरात ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. महावितरणकडून 1 जुलैपासून पालखी प्रस्थान सोहळा संपेपर्यंत 24 तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र उपकेंद्रांचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे. गर्दीच्या भागातील सर्व रोहित्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून उर्वरित कामेही लवकर पूर्ण होणार आहेत. ग्रामीण रुग्णालयात नियमित 30 खाटांव्यतिरिक्त 40 अतिरिक्त खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
याशिवाय 5 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध असतील. भाविकांच्या सेवेसाठी 11 रुग्णवाहिका तैनात राहणार असून त्यामध्ये 102 क्रमांकाच्या 6 आणि 105 क्रमांकाच्या 5 रुग्णवाहिकांचा समावेश आहे. पालखीतळ आणि ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहतील. भाविकांना दिल्या जाणार्या अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची चार विशेष पथके 1 जुलैपासून कार्यरत राहणार आहेत.
हॉटेल्स, अन्नछत्रे आणि अन्नदान करणार्या संस्थांची नियमित तपासणी केली जाणार असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून वितरित करण्यात येणार्या खिचडीचीही गुणवत्ता तपासली जाणार आहे. मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ते मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून हायमास्ट दिवे, सिग्नल यंत्रणा आणि इतर नागरी सुविधा दुरुस्त करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
चकडेकोट पोलीस बंदोबस्त
वारीसाठी 150 पोलीस अधिकारी आणि 990 पोलीस कर्मचारी, असा एकूण 1,140 जणांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके आणि हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सुरक्षेसाठी 190 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याचे नियंत्रण आळंदी पोलीस ठाण्यातून केले जाणार आहे.
वाहनांसाठी 47.5 एकर पार्किंग
वारीदरम्यान वाहतूक नियंत्रणासाठी दिघी मॅगझीन फाटा, मोशी चौक, आळंदी फाटा, वाय जंक्शन, तळेगाव चौक यांसह विविध ठिकाणी नियंत्रण बिंदू उभारण्यात येणार आहेत. भाविकांच्या वाहनांसाठी 47.5 एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
“मागील वर्षांतील त्रुटी लक्षात घेऊन यंदा सर्व विभागांनी अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत ठेवावी. 30 जूनपर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पुढील आढावा बैठकीत अहवाल सादर करावा.”
– अनिल दौंडे, उपविभागीय अधिकारी





