जालना – एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेना हादरून गेली आहे. पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. आपल्याच पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार करत शिंदे यांनी भाजपसोबत वेगळी चूल मांडत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या शिंदे यांनी एवढ्यावरच न थांबता आता थेट पक्ष व निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता असून ठाकरे व शिंदे पक्ष व चिन्ह आपल्याकडेच राहावे यासाठी संघर्ष करताना दिसतायेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंसोबतच्या या संघर्षात आणखी एक बाजी मारली मारली आहे. शिवसेनेचे मराठवाड्यातील बडे नेते अर्जुन खोतकर यांनी आज साश्रू नयनांनी, ‘अडचणीत असलेला माणूस आधार शोधतो’ असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले.
खोतकरांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
१. उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय
“माझं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलणं झाले. माझी जी परिस्थिती आहे त्यांच्या कानावर सगळं घातलं आहे. जिल्ह्यातील नेत्यांशी बोललो. मी सच्चा शिवसैनिक आहे. ४० वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. परंतु काही निर्णय घेणे अपेक्षित होते. याबाबत पक्षप्रमुखांना मी कळवलं. मी सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय. मी पक्षप्रमुखांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. त्यामुळे त्यांचेही समाधान झाले आहे असं त्यांनी सांगितले.” अशी माहिती खोतकर यांनी दिली.
२. आजतागायत पक्षाची प्रामाणिकपणे सेवा
खोतकर म्हणाले, “१९८९-९० मध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेकडून आमदार झालो. आजतागायत प्रामाणिकपणे मी पक्षाची सेवा केली. यामध्ये मी एकटाच नाही तर सर्व सहकारी या सर्वांनी मिळून जालना जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवलं. सामान्य माणसांपर्यंत घेऊन गेलो आणि सामान्य माणसानेही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यात लोकांनी आमच्या पदरात यश टाकलं. त्याबद्दल मी लोकांचे आभारी आहे.”
३. जालना शुगर फॅक्टरीबाबत स्पष्टीकरण
“मुळात हे प्रकरण जालना शुगर फॅक्टरी २०१२ कापडियांनी ४२ कोटींना विकत घेतली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी त्यांना विकत घेण्याची विनंती केली. विहित मुदतीत कापडियांना पैसे भरणं शक्य झालं नाही. तेव्हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अजित सिंग यांनी ४४ कोटींना घेतले. माझे आणि कुटुंबाचे ७ कोटी या कारखान्यात गुंतवणूक केली. ५ कोटी देवगिरी बँकेकडून कर्ज घेतले. ते आजही भरले नाही. ६० लाख माझ्या नावावर भरले आहेत. ३५ लाख भाऊ चक्रधर खोतकर आणि इतर भावांनी मदत करून ७ कोटी गुंतवले. आम्ही IMA साठी अर्ज केला. कारखाना सुरू करण्यासाठी ते गरजेचे लागते. या आर्थिक व्यवहाराबाबत न्यायप्रविष्ट बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो तेव्हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मी कारखाना सुरू करण्यासाठी मदत करायला तयार आहे असं आश्वस्त केले.” असेही त्यांनी सांगितले.