Anurag Kashyap Birthday: दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा प्रवास : पाच हजार रुपयांत मुंबई गाठून झाला आज बॉलिवूडचा दिग्गज

Anurag Kashyap Birthday: बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे अनुराग कश्यप आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि वास्तवदर्शी सिनेमांमुळे त्यांनी इंडस्ट्रीत खास स्थान निर्माण केले आहे. पण हा प्रवास इतक्या सहज झाला नाही.
अनुराग कश्यप यांचा जन्म १० सप्टेंबर १९७२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी देहरादूनमध्ये घेतले. नंतर ग्वाल्हेरला स्थलांतर झाले. बालपणी त्यांचे स्वप्न होते वैज्ञानिक होण्याचे. त्यामुळेच त्यांनी दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, इथेच त्यांचे आयुष्य बदलले.
सिनेमा क्षेत्राकडे वळण्याचा टर्निंग पॉइंट
कॉलेजमध्ये असताना अनुराग ‘जन नाट्य मंच’ या थिएटर ग्रुपशी जोडले गेले. नुक्कड नाटकांमध्ये भाग घेऊ लागले. त्यानंतर त्यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जाण्याची संधी मिळाली. केवळ १० दिवसांत त्यांनी तब्बल ५५ चित्रपट पाहिले आणि याच अनुभवातून त्यांनी ठरवले की पुढचा प्रवास सिनेमा क्षेत्रातच करायचा.
पाच हजार रुपयांत मुंबई गाठली
सन १९९३ मध्ये अनुराग फक्त ५ हजार रुपये घेऊन मुंबईत आले. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. पैशांची तंगी असल्याने अनेकदा त्यांना रस्त्यावरच झोपावे लागले. मात्र संघर्षाच्या या काळात पृथ्वी थिएटरमध्ये काम करत त्यांनी स्वतःला इंडस्ट्रीशी जोडून ठेवले. अभिनेता मनोज बाजपेयीच्या ओळखीमुळे त्यांची भेट राम गोपाल वर्मा यांच्याशी झाली आणि त्यांच्यासाठी दारे उघडली.
करिअरची सुरुवात व दिग्दर्शन
रामगोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटाच्या लेखनात अनुराग कश्यप यांनी सहभाग घेतला आणि तेथूनच त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात ‘पाच’ या चित्रपटाने केली, मात्र तो रिलीज होऊ शकला नाही. त्यांचा पुढचा चित्रपट ‘ब्लॅक फ्रायडे’ (मुंबई बॉम्बस्फोटांवर आधारित) प्रचंड गाजला आणि अनुराग कश्यप यांना धाडसी व वास्तवदर्शी दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.
पुढील वाटचाल
यानंतर गँग्स ऑफ वासेपुर, देव डी, गुलाल, मुक्काबाज यांसारख्या सिनेमांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यांनी सिनेमा केवळ मनोरंजनाचे माध्यम न ठेवता समाजाचे वास्तव दाखवणारे आरसे बनवले. आज अनुराग कश्यप हे बॉलिवूडमध्ये एक वेगळ्या विचारांचे दिग्दर्शक म्हणून आदराने पाहिले जातात.





