नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील प्रकरणाची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आज आणखी एका न्यायाधीशाने नकार कळवला आहे. अनिरुद्ध बोस असे या न्यायाधीशांचे नाव असून ते कोलकात्याचे रहिवासी आहेत. त्यांच्यापुढे नारदा प्रकरणातील केस सुनावणीसाठी येणार होती.
ममता बॅनर्जी यांचीही याचिका त्यात आहे. पण आपण ही केस सुनावणीसाठी घेणार नाही, असे त्यांनी आज स्पष्ट करीत यातून आपली माघार घेतली. आता ही केस दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला करण्यात आली आहे.
या आधी इंदिरा बॅनर्जी यांनीही बंगालच्या कोणत्याही खटल्याची सुनावणी आपल्यापुढे नको अशी भूमिका घेत आपली माघार घोषित केली होती. योगयोगाने त्याही कोलकात्याचाच रहिवासी आहेत. नारदा केस प्रकरणात ममता बॅनर्जी आणि बंगालचे विधी मंत्री मोलोई घातक यांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला आव्हान देणारी याचिका सादर केली आहे.
या प्रकरणात ममता बॅनजी व विधी मंत्र्यांचे एक प्रतिज्ञापत्र सादर करून घेण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्याला ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्याच्या सुनावणीचा हा विषय आहे.