मुंबई : विधान परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील (Maharashtra Politics) घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वर्षा गायकवाड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे. का दिला राजीनामा? नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजय झाला होता, त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 7 विद्यमान आमदारांचा विजय झाला. यामध्ये प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे, रवींद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, संदीपान भुमरे, कल्याण काळे यांचा समावेश होता, त्यामुळे या आमदारांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विधान परिषदेच्या 14 जागा रिक्त महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या 14 जागा रिक्त झाल्या आहेत, त्यातला 11 जागांवर 12 जुलैला मतदान होणार आहे. या 11 जागांपैकी 5 जागांसाठी भाजप, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी 2 जागांसाठी महायुती प्रयत्नशील असेल. तर उर्वरित 2 जागा मविआ एकत्र लढू शकते. यात काँग्रेसला एक तर महाविकास आघाडी एकत्रित एक जागा लढण्याची शक्यता आहे. कोणत्या 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार राज्यातील 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, महादेव जानकर, अनिल परब, मनीषा कायंदे, डॉक्टर वजाहर मिर्झा आणि डॉक्टर प्रज्ञा सातव, बाबाजानी दुराणी, जयंत पाटील यांचा समावेश आहे.