NCRB Records Animal Cruelty Cases : देशात पहिल्यांदाच प्राण्यांवरील क्रूरतेची दखल; गुन्हे नोंदणीत महाराष्ट्र अव्वल
देशातील गुन्हेगारीचा अधिकृत लेखाजोखा मांडणाऱ्या 'राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो'ने (एनसीआरबी) यंदा एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

NCRB Records Animal Cruelty Cases – देशातील गुन्हेगारीचा अधिकृत लेखाजोखा मांडणाऱ्या ‘राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो’ने (एनसीआरबी) यंदा एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
२०२४ च्या वार्षिक अहवालात पहिल्यांदाच प्राण्यांवरील क्रूरतेच्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला असून, ‘प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्या’खाली देशभरात ९ हजार ०३९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये २ हजार ९२७ प्रकरणांसह महाराष्ट्र संपूर्ण देशात अव्वल स्थानी आहे.
प्राण्यांवरील हल्ल्यांचा मागोवा घेणारा कोणताही अधिकृत देशव्यापी माहितीसंग्रह नसल्याने, प्राणी हक्क कार्यकर्त्यांकडून सातत्याने अशा डेटाबेसची मागणी केली जात होती.
मानवांवरील हल्ल्यांची नोंद होत असताना, मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराची अधिकृत दखल घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर एनसीआरबीचा हा नवा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
हा दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेला मुद्दा होता. सरासरी पाहता, दररोज ९ ते १० ह्जार प्रकरणे समोर येत असतील. आणि ही संख्या इतर कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रकरणांपेक्षा अधिक आहे.
जगभरातील खुनी, दरोडेखोर किंवा हिंसक गुन्हेगारांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, त्यांनी गुन्हेगारीची सुरुवात प्राण्यांवरील हल्ल्यांनीच केली आहे.
अमेरिकेतील ‘एफबीआय’नेही प्राणी छळाला गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवले आहे. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिल्यास भविष्यातील मानवी हिंसाचारालाही आळा बसेल.
– मेनका गांधी, माजी केंद्रीय मंत्री.
राज्यांची आकडेवारी काय सांगते?
अहवालानुसार, महाराष्ट्रापाठोपाठ तेलंगणामध्ये १ ह्जार ८९०, केरळमध्ये १ ह्जार ५१० आणि उत्तर प्रदेशात १ हजार १२१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. कर्नाटक (३२०), तामिळनाडू (२५९) आणि गुजरातमध्ये (१८१) हे प्रमाण तुलनेने कमी आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांसह लडाख, लक्षद्वीप आणि चंदीगडमध्ये या कायद्याखाली एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.





