Andheri By-Election: ‘अजूनही वेळ आहे, त्यांनी मोठं मन दाखवून निवडणूक बिनविरोध करावी’, ठाकरे गटाचं आवाहन

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपला करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके शुक्रवारी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार असून अद्याप शिंदे-भाजप गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही, अशावेळी ही निवडणूक बिनविरोध होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना परब म्हणाले की, हे आवाहन मी आधी देखील केले आहे. महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारची संस्कृती आहे. आजही राज्यातील राजकारण खालच्या पातळीला गेले असे मी म्हणणार नाही, पण जे काही चालले आहे ते योग्य नाही. आजपर्यंत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूकीसाठी त्याच्या घरातील व्यक्ती उभा असेल तर महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. आता देखील त्यांनी मोठं मन करून निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्रात अजूनही ती संस्कृती असल्याचे दाखवून द्यावे, असे परब म्हणाले.
ऋतुजा लटके उद्या भरणार अर्ज
लटके यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाराच्या आरोपावर परब म्हणाले की, एखादी विधवा महिला निवडणूकीला उभी राहते तेव्हा तिच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण असले पाहिजे. ऋतुजा लटके यांनी 3 तारखेला राजीनामा दिला. त्यानंतर त्या कार्यालयातही जात नाहीत. आणि 12 तारखेला त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. यावरून राज्यातील राजकारणाची पातळी दिसून येते. न्यायदेवतेने आज न्याय दिला. उद्या शुक्रवारी 11 वाजता लटके यांचा महनगरपालिकेतील पदाचा राजीनामा स्वीकारला जाईल आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत जावून उमेदवारी अर्ज भरतील.
दरम्यान, अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. येथील जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट-भाजप यांची ताकद पणाला लागणार आहे. दोघांकडूनही जोरदार तयारी सुरु असल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाला येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा पाठिंबा आहे. तर भाजपला बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आहे.





