Anger Management: राग ही नैसर्गिक मानवी भावना आहे. कधी तो आपल्याला अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद देतो, तर कधी अनियंत्रित झाला तर नातेसंबंध आणि आरोग्य दोन्ही बिघडवतो. तज्ज्ञांच्या मते, सततचा आणि तीव्र राग हा उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक तणावाचे कारण ठरू शकतो. त्यामुळे वेळेत रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे सामान्य झाले आहे. पण वैद्यकीय विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही सांगतात की, सततचा राग शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदानुसार राग हा शरीरातील पित्त आणि कफ या दोषांच्या असंतुलनाचे लक्षण आहे. त्यामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो आणि मन अस्थिर होते.(Anger Management) राग आल्यावर सर्वात आधी श्वासोच्छ्वास वेगाने होतो आणि हृदयाची धडधड वाढते. अशा वेळी “४-७-८” ही श्वसन पद्धत उपयोगी ठरते. डोळे बंद करून चार सेकंद नाकाने श्वास घ्या, सात सेकंद श्वास रोखून ठेवा आणि आठ सेकंदांत हळूहळू तोंडाने श्वास सोडा. ही प्रक्रिया काही वेळा केल्यास मेंदू शांत होतो आणि विचार स्पष्ट होतात. भावनिक प्रतिक्रिया कमी होऊन आपण स्थिर निर्णय घेऊ शकतो. Anger Management राग आल्यावर एक ग्लास थंड पाणी पिणेही फायदेशीर ठरते. शरीराचे तापमान वाढल्यामुळे चिडचिड वाढते. थंड पाणी हळूहळू घोटघोट पिल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत होतात. त्याचबरोबर त्या परिस्थितीपासून थोडा वेळ दूर जाणेही उपयुक्त ठरते. वाद वाढत असताना पाच मिनिटे त्या जागेपासून दूर गेल्यास अनावश्यक शब्द बोलण्यापासून बचाव होतो. Anger Management दीर्घकालीन उपाय म्हणून काही नैसर्गिक पद्धती उपयोगी ठरतात. आयुर्वेदात तुळस, अश्वगंधा आणि हळद यांचा उल्लेख आहे. तुळशीचा चहा किंवा पाने चावल्याने ताण कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज १०-१५ मिनिटे अनुलोम-विलोम आणि कपालभाती प्राणायाम केल्यास मज्जासंस्था मजबूत होते आणि मन स्थिर राहते. राग मनात साठवून ठेवणे म्हणजे हातात जळता कोळसा धरून ठेवण्यासारखे आहे. त्याने दुसऱ्यापेक्षा आधी आपलेच नुकसान होते. त्यामुळे राग ओळखणे, स्वीकारणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांचाही राग नियंत्रणात ठेवण्यात मोठा वाटा असतो. एकूणच, राग पूर्णपणे नष्ट करणे शक्य नसले तरी योग्य सवयी आणि नैसर्गिक उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते. शांत आणि निरोगी आयुष्यासाठी आजपासूनच या सोप्या उपायांचा अवलंब करा.