Maharashtra Politics : राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी आपली उद्विग्नता जाहीरपणे व्यक्त केली. शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधून आपली नाराजी कळवली. पाच वेळा खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांनी भारतीय जनता पक्षावरही गंभीर आरोप केले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून तत्कालीन खासदार नवनीत राणा यांच्यासाठी आपण माघार घेतली होती. त्यावेळी आपल्याला राज्यपाल पदाचे लेखी आश्वासन देण्यात आले होते, असा दावा अडसूळ यांनी केला. “आता १० नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या, पण माझे नाव त्यात नव्हते. राज्यपाल पद सोडा, किमान राज्यसभेची संधी तरी मिळायला हवी होती,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. स्वतःला उमेदवारी मिळाली नसती, तरी पक्षाने त्यांचे पुत्र आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांचा विचार करायला हवा होता, असेही त्यांनी नमूद केले. अभिजीत अडसूळ हे माजी वैमानिक असून पक्षाचे सचिव म्हणून त्यांनी परराज्यात पक्षविस्तारासाठी मोठे काम केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे, राज्यसभेच्या या शर्यतीत गजानन कीर्तीकर, राहुल शेवाळे आणि हेमंत गोडसे यांसारख्या दिग्गज माजी खासदारांची नावे असताना पक्षाने मात्र अनपेक्षितपणे ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.