Ambegaon News: शेतकऱ्यांची चिंता मिटणार! आंबेगाव तालुक्यासाठी तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा निधी मंजूर; पाहा काय आहे योजना?
Ambegaon News: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती; मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या आढावा बैठकीत मोठा निर्णय.

Ambegaon News – आंबेगाव तालुक्यातील शेतशिवारातील पाणंद रस्ते खुले करण्यासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सुमारे १५ कोटी रुपयांच्या पुढील आराखड्याची तयारी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. पुढील एक ते दोन वर्षांत तालुक्यातील गावागावांतील लहान-मोठे पाणंद रस्ते खुले करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि.२७ रोजी दिली.
घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील पंचायत समितीच्या सभाग्रहात मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या आढावा बैठकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलास बुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी,संजय पवळे तसेच रामशेठ तोडकर,संतोष धुमाळ, प्रांत अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार डॉ.सचिन वाघ,
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज आदी मान्यवर उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले ग्रामीण भागात राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामरस्त्यांचे जाळे असले तरी शेतकऱ्यांना शेतातील पिके, शेतीमाल आणि कृषी साहित्याची वाहतूक करताना पाणंद रस्त्यांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
ही समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने पाणंद रस्ते विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शेतशिवारातील छोट्या रस्त्यांचे रुंदीकरण, त्यांची नोंदणी करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत ते शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी खुले करण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली. याशिवाय तालुक्यातील आदिवासी भाग,
तसेच शिरूर तालुका येथील ४२ गावांसह इतर भागांमध्येही हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाणंद रस्त्याच्या प्रकल्पामुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेती विकासाला चालना मिळण्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या अडचणी दूर होतील, असा विश्वास वळसे पाटील यांनी व्यक्त केला.






