Ambadas Danve : लाडक्या बहिणींना आदिवासींच्या वाट्याचे पैसे; अंबादास दानवेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. मात्र, सरकारी तिजोरीवर ताण असतानाही हप्ता दिला जात असल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे.
दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता भरण्यासाठी सरकारने आदिवासी विकास खात्यातील आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील निधी वळवला आहे. त्यांनी सरकारवर आर्थिक संकट लपवून महिलांच्या भावना वापरण्याचा आरोप केला आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! अशा प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले!, असा आरोपच दानवेंकडून करण्यात आला.
तर, दानवेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही. त्यामुळे आता दानवेंनी केलेल्या या आरोपांवर सरकारकडून काय स्पष्टीकरण देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याशिवाय, सरकारने खरंच आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.





