Ajit Pawar : विरोधकांच्या दिल्लीतून निर्णयाच्या आरोपांवर अजित पवारांच भाष्य; जागावाटपाच्या सूत्राबाबत स्पष्टचं बोलले! पण…

Ajit Pawar : महायुतीमध्ये सारं काही आलबेल असल्याचं महायुतीमधील नेते सातत्याने सांगत असतात. पण विरोधकांकडून फडणवीस सरकारचे सर्व निर्णय हे दिल्लीतून होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. आता या आरोपांवर महायुतीचा एक भाग असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत आपली भूमिका मांडली आहे. पण अजित दादांनी केलेल्या विधानामुळे मित्रपक्षात असवस्थथा पसरल्याची देखील चर्चा होत आहे. त्यामुळे दादांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारची सुत्रं दिल्लीतून हलवली जातात. शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष तर मोदी-शाहाच चालवतात असे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. विरोधकांच्या या आरोपांवर अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारी देण्यासाठी दिल्लीला जाऊन कुणाला विचारावं लागत नाही. आपलं आपण ठरवणार आहोत, असं विधान करत अप्रत्यक्षपणे मित्रपक्षांना त्यांनी टोला लगावल्याची चर्चा सुरू आहे.
आता या वक्तव्यावर मित्रपक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अजितदादांचा पक्ष हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याचा टोला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. आमचं नेतृत्वही महाराष्ट्रामधीलच आहे. त्यामुळे अजितदादांचा टोला आमच्यासाठी नसावा असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. यामुळे मित्रपक्षांमध्ये अजित पवार यांच्या विधानावरून कलगीतुरा रंगल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
जागावाटप कोणत्या निकषांवर ठरविण्यात येणार?
यानंतर आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार यांनी कुणालाही टोला लगावला नाही, तर महायुतीमधील प्रत्येक पक्ष स्वतंत्र असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या विधानाची भाजप आणि शिवसेनेत नाराजीचा सूर उमटल्याचं बोललं जातं आहे. विरोधक ज्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेला आगपाखड करतात तोच धाग अजित पवारांनी पकडला आहे. यामुळे आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपात मित्रपक्षात रस्सीखेच होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागावाटप कोणत्या निकषांवर ठरविण्यात येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : त्रिभाषा सूत्रासाठी घेणार जनतेचा कौल; ठाकरे बंधुंचीही घेणार भेट, समितीच्या बैठकीनंतर नरेंद्र जाधवांची माहिती





