माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांची टीका : राज्यात उच्चांकी दर दिल्याने मुरुम ग्रामस्थांनी केला सत्कार
सोमेश्वरनगर- अजित पवार हे शेतकऱ्यांचे खरे लुटारू आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेण्याचा कोणताच अधिकार नसल्याची खरमरीत टीका माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 2018-19 हंगामाचा सभासदांना प्रतिटन 3400 रुपये भाव दिल्याबद्दल मुरूम (ता. बारामती) येथे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने कारखान्याच्या संचालक मंडळाचा व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सरकारास उत्तर देताना तावरे बोलत होते. याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी संचालक फत्तेसिंग जगताप, ज्येष्ठ संचालक नामदेव शिंगटे, माळेगावचे उपाध्यक्ष चिंतामणी नवले, संचालक प्रमोद गावडे, अशोक सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य आप्पाजी गायकवाड, अविनाश जगताप, शहाजी जगताप, नंदकुमार शिंदे, धन्यकुमार जगताप, दिग्विजय जगताप, अशोक मुळीक उपस्थित होते.
रंजन तावरे म्हणाले की, कर्ज यांनीच काढले, थकणारे हेच, आणि कारखाने घेणारे सुद्धा हेच, आशा प्रकारे सहकारी कारखानदारी मोडीत निघत आहे असल्याची टीका त्यांनी केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे यांना उत्कृष्ठ सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पी. के. जगताप म्हणाले की, सोमेश्वरने तीन वर्षे फक्त एफआरपी दिली. माळेगावपेक्षा पाच वर्षांत 773 रुपये कमी दिले असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविराज जगताप तर प्रशिल जगताप यांनी आभार मानले.
- सोमश्वर, माळेगाव कारखाने शेजारीच आहेत, दोन्ही कारखान्याच्या संचालकांनी चांगले ते स्वीकारावे, आपली शेतकरी जात आहे, त्यांच्या प्रपंच्याला दोन पैसे कसे मिळतील याकडे संचालकांनी लक्ष द्यावे.
– चंदरराव तावरे, ज्येष्ठ सहकारतज्ज्ञ - मध्यंतरी कारखाना अडचणीत गेला होता, पण तो प्रकल्पामुळे अडचणीत गेला असलेला चुकीचा प्रचार करण्यात आला. उलट प्रकल्पांमुळे सोमेश्वर अडचणीत गेला नव्हता, उलट प्रकल्पांच्या उत्पादनामुळे आज कारखाना सुस्थितीत आहे.
– शहाजी काकडे, माजी अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना - सोमेश्वरच्या निवडणुकीत पॅनेल उभे करणार
सोमेश्वरच्या संचालकांनी 3300 रुपयांमधून 150 रुपये कापण्याचा घाट घातला आहे, तो पहिले बंद करा, आणखी किती लुटता शेतकऱ्यांना? या संचालकांचा एकदम पोरगळ बारगळ कारभार चालला आहे. दरम्यान, विधानसभेला अजित पवार यांचेच काम करणार आहे. पण वेळ आली तर सोमेश्वर कारखान्याची निवडणुकीत पॅनल उभी करून निवडणूक लढवणार आल्याचे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी स्पष्ट केले.