Ajit Pawar : बीड रेल्वे स्थानकाच्या बहुप्रतीक्षित लोकार्पण सोहळ्याला (17 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, तसेच स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते. बीड रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनानंतर अजित पवारांनी भाषणात बीडमधील विकासकामांचा आढावा घेतला आणि सभेतील हुल्लडबाजांना खडेबोल सुनावले. “आज उद्घाटन आहे, म्हणून मोफत प्रवास ठीक आहे, पण उद्यापासून तिकीट काढा, चांगल्या सवयी लावा,” असं म्हणत अजित पवारांनी बीडकरांना चांगलंच धुतलं. “मी महाराष्ट्रभर फिरतो, पण तुम्ही असं चिगळता, ह्या.. हू.. करताय, कधी सुधारणार? जग पुढे चाललंय, आत्मचिंतन करा. समाजात तेढ का निर्माण करता?” असं म्हणत त्यांनी हुल्लडबाजांना झापलं. अजित पवारांनी सांगितलं की, रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांच्या काळात या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालं होतं. आज 68 किमीच्या नव्या रेल्वे मार्गाची सुरुवात झाली आहे, जी लाखो लोकांच्या स्वप्नांना जोडणारी आहे. “हा मार्ग फक्त दोन जिल्हे जोडणारा नाही, तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा योग साधणारा आहे,” असं ते म्हणाले. याशिवाय, बीडसाठी विमानतळाचं स्वप्नही त्यांनी उलगडलं. “नको तिथे राजकारण आणू नका. विकासकामांसाठी पैसे कमी पडू देणार नाही. सहा विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी निधी द्यायला तयार आहे,” असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर दिलं. “राजकीय दबाव आला तरी मी आहे” अजित पवारांनी बीडच्या विकासाला गती देण्याचं आश्वासन देताना म्हणाले, “अंबाजोगाईत आशिया खंडातील पहिलं ग्रामीण विद्यालय आणि रुग्णालय आहे. गोरगरिबांना उपचारासाठी पुण्याला जावं लागू नये, यासाठी प्रयत्न करतोय. परळीत पशुसंवर्धन महाविद्यालय उभारलं जातंय.” ते पुढे म्हणाले, “मुंडे भाऊ-बहीण माझं काही ऐकतात. आता वाद घालू नका. निधी कमी पडणार नाही, पण पैसा सत्कारणी लागला पाहिजे. चुकीच्या खर्चाला कोणाचीही गय करणार नाही. राजकीय दबाव आला तरी मी आहे”, असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.