प्रभात वृत्तसेवा सोमेश्वरनगर – राज्यातील पूरस्थितीवर सरकार गांभीर्याने काम करीत असून बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. परवाच बावीसशे कोटींची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. अजूनही केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी निकषांपेक्षा अधिक मदत देण्याचा विचार आम्ही करतो आहोत. निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. आम्ही कुणावर उपकार करीत नाही, हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, प्रमोद काकडे, आर. एन. शिंदे, शहाजी काकडे, राजेंद्र यादव, जगन्नाथ लकडे,भरत खैरे, सुचिता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी मिश्कीलपणे, “आम्हाला खाज होती म्हणून माळेगावला चेअरमन झालो. आता पुढे सोमेश्वरलाही होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्ड मोडतो, अशी गंमत केली. पुढे ते म्हणाले की, पुणे जिल्हा बँकेत सुमारे १ हजार लेखनिक, अधिकारी, शिपाई व चालकांची भरती होणार असून हे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर होईल. एमकेसीएल या नामांकित संस्थेला परीक्षेची जबाबदारी देण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असेल, कुणालाही ‘वजन’ टाकावे लागणार नाही, अशी खात्री त्यांनी दिली. सूत्रसंचालन नितीन यादव यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले. अपहार, फसवणूक आढळल्यास माफी नाही.. पवार म्हणाले की, नीरा डावा कालव्याला काही ठिकाणी गळती असून फुटण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी तातडीने अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. मात्र सरसकट अस्तरीकरण करण्याऐवजी फक्त धोक्याच्या ठिकाणीच हे काम केले जाईल. सोमेश्वर कारखान्याच्या परिसरातील वाहतूक वाढल्याने रस्त्यालगत असलेली दुकानांची जुनी रांग हलवावी लागेल. यासाठी कारखान्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली असून व्यापाऱ्यांनी हा पर्याय स्वीकारावा. कारखाना किंवा इतरत्र कुठेही अपहार, फसवणूक आढळल्यास अजिबात माफी दिली जाणार नाही. शेतकरी व जनतेच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जाणार नाही, असा कडक इशारा पवार यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.