Sachin Vaze Case : वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर सचिन वाझे प्रकरणी अजित पवार यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले…

मुंबई – सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने वाझे प्रकरणावरून सरकारला घेरलं असून या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या यासंदर्भात बैठका सुरू आहेत.
आजही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन वाझे प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
“महाविकास आघाडी सरकार हे शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन तयार केले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था ही चांगलीच पाहीजे. त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं अजिबात कारण नाही. दोन्ही तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप असू नये ही सरकारची भूमिका आहे.”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब उपस्थित होते. सकाळी 9 वाजता ही बैठक सुरू झाली होती. सचिन वाझे प्रकरण हाच या बैठकीतील मुख्य मुद्दा होता.





