Ajit Pawar : अजितदादांच्या निधनानंतर दहिवडीत कडकडीत बंद; व्यापाऱ्यांनी स्वतःहून ओढले दुकानांचे शटर
Ajit Pawar : ग्रामपंचायतींचा पुढाकार, सोशल मीडियावर शोकसागर: केवळ शहरच नाही तर गावगाड्यानेही वाहिली 'दादां'ना श्रद्धांजली.

Ajit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच माण तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या दहिवडी शहरात आज सर्व व्यापारी संघटनांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून लाडक्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर दहिवडीतील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर आणि इतर व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते. “अजित दादांचे राज्याच्या विकासातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांवरील पकड मोठी होती. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक खंबीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना व्यापारी संघटनेने व्यक्त केली.केवळ दहिवडी शहरच नव्हे, तर माण तालुक्यातील विविध गावांमध्येही दुःखद वातावरण पाहायला मिळाले.
ग्रामपंचायतींचा पुढाकार: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विशेष सभा घेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागरिकांच्या भावना: सर्वसामान्य नागरिकांनी “आपला हक्काचा माणूस गेला” अशी भावना व्यक्त केली. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आले.सोशल मीडियावरून शोक व्यक्त: तालुक्यातील युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार यांचा माण-खटाव या दुष्काळी भागाशी नेहमीच जिव्हाळा राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे या भागातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावणारा एक आग्रही नेता हरपल्याची भावना जनमानसात उमटत आहे. दहिवडी येथील मुख्य चौकात जमलेल्या नागरिकांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.दुखवट्यामुळे दहिवडीतील सार्वजनिक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली असून, संपूर्ण माण तालुका आज या महान नेत्याच्या स्मृतींना वंदन करत शांततेत सहभागी झाला आहे.





