Ajit Agarkar clarifies about Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 रोजी सांगितले की, सीनियर फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे ‘आकलन’ केले जाईल, परंतु प्रत्येक सामन्यात त्यांना तपासणे ‘मूर्खपणाचे’ ठरेल. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर विराट-रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या विश्वचषकापूर्वी या दोन्ही माजी कर्णधारांच्या कामगिरीची प्रत्येक मालिकेत समीक्षा होईल, अशा अटकळी आहेत. रोहित-विराट यांच्याबाबत अगरकर काय म्हणाले? अहमदाबाद येथे काही आठवड्यांपूर्वी शुबमन गिलला नवीन एकदिवसीय कर्णधार घोषित केल्यानंतर आगरकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रत्येक सामन्यात त्यांचे आकलन करणे मूर्खपणाचे आहे. जेव्हा ते खेळायला सुरुवात करतील, तेव्हा त्यांचे आकलन होईल, परंतु त्यांची जागा धोक्यात नाही.” दोन वर्षांनंतर होणाऱ्या विश्वचषकासाठी संघ निवडीबाबत त्यांनी कोणतेही ठोस अपडे़ देण्यास नकार दिला. माजी वेगवान गोलंदाज आगरकर पुढे म्हणाले, “याचा अर्थ असा नाही की जर त्यांनी ऑस्ट्रेलियात धावा केल्या नाहीत, तर त्यांना संघातून वगळले जाईल किंवा जर त्यांनी ऑस्ट्रेलियात तीन शतके केली, तर त्यांची 2027 विश्वचषकासाठी निवड निश्चित होईल.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोहली आणि रोहित यांनी स्वतःहून कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता आणि निवड समिती त्यांच्या अनुभवाने समाधानी आहे. हेही वाचा – Mohammed Shami : रणजीसाठी फिट, मग वनडेसाठी अनफिट का? शमीच्या खरमरीत प्रश्नावर आगरकरांचं स्पष्टीकरण त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा – आगरकर म्हणाले, “जर अनुभवाची गरज असती, तर ती इंग्लंड दौऱ्यासाठी होती. हे दोन्ही खेळाडू दिग्गज आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि एकदा त्यांनी निर्णय घेतला, तर त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करायला हवा.” त्यांनी मोहम्मद शमीची इंग्लंड मालिकेसाठी निवड न करण्यामागचे कारणही स्पष्ट केले. ते म्हणाले, “शमी त्या दौऱ्यासाठी तंदुरुस्त नव्हता. गेल्या सहा ते आठ महिन्यांत त्याची सामान्य सामना तंदुरुस्ती योग्य नव्हती.” हेही वाचा – क्रिकेट विश्वात नव्या फॉरमॅटचा उदय! काय आहे ‘Test Twenty’ फॉरमॅट? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिघ कृष्णा, हर्षित राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).