Ajinkya Rahane : ‘काही खेळाडू संघाबाहेर गेले असते…’, बुमराहने असे काय केले की त्याचे कौतुक करताना थकत नाही रहाणे

Ajinkya Rahane lauded Jasprit Bumrah courage : भारत आणि इंग्लंड यांच्यातील नुकतीच झालेली पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या उपलब्धतेची जोरदार चर्चा झाली. वर्कलोड व्यवस्थापनामुळे त्याला पाचव्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. यापूर्वी दुसऱ्या सामन्यातही तो खेळला नव्हता. बुमराहने विश्रांती घेतल्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र, आता अजिंक्य रहाणेने बुमराहचे निर्णयाचे कौतुक केले आहे.
खरेतर, बुमराहने इंग्लंड दौऱ्यापूर्वीच संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की तो केवळ तीन कसोटी सामने खेळणार आहे. त्याने पहिला, तिसरा आणि चौथा सामना खेळत एकूण 14 विकेट्स घेतल्या. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे (स्ट्रेस फ्रॅक्चर) वर्कलोड व्यवस्थापनावर लक्ष द्यावे लागले. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मालिकेपूर्वी सांगितले होते की, 31 वर्षीय बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळेल.
बुमराहला चाहत्यांच्या टीकेला जावे लागले सामोरे –
पाचव्या सामन्यात न खेळण्याच्या निर्णयामुळे बुमराहला चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण हा सामना मालिका बरोबरीत राखण्यासाठी भारताला जिंकणे आवश्यक होते. तथापि, अनेक तज्ज्ञांनी बुमराहच्या या धाडसी निर्णयाचे समर्थन केले. बुमराहने संघ व्यवस्थापनाला आपल्या उपलब्धतेबाबत स्पष्टता देण्याच्या निर्णयाचे माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनीही कौतुक केले. रहाणे म्हणाला की, अशा प्रकारे स्पष्टता देणाऱ्या खेळाडूंना काहीवेळा संघातून बाहेर काढले जाते.
हेही वाचा – Hit Wicket Debate : आउट की नॉट आउट? फलंदाजाने शॉट खेळला अन् टोपीने बेल्स पडल्या, VIDEO होतोय व्हायरल
अजिंक्य रहाणेकडून बुमराहचे कौतुक –
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रहाणे म्हणाला, “बुमराहने खूप स्पष्टता दाखवली, जी मला खूप आवडली. त्याला मालिकेपूर्वीच माहित होते की त्याला काय करायचे आहे. त्याने सांगितले, ‘मी पहिला सामना खेळेन, दुसरा नाही आणि मग तिसरा खेळेन.’ कर्णधाराला अशी स्पष्टता मिळणे खूप महत्त्वाचे आहे. भारतासाठी खेळताना अशी स्पष्टता देणे खूप कठीण असते. अनेकदा अशा गोष्टी बोलणाऱ्या खेळाडूंना संघातून बाहेर काढले जाते.”
हेही वाचा – Mohammed Siraj : सिराजच्या घरातील भिंतीवर असलेली एक खास फोटो फ्रेम का होतेय व्हायरल? जाणून घ्या कारण
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला, “बुमराहने कर्णधार आणि व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगण्याचे धाडस दाखवले. यावरून हेही दिसते की तो संघाला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो. भारतासाठी खेळताना असे करणे सोपे नसते. काहीवेळा खेळाडू असा संदेश देतात आणि त्यांना संघातून बाहेर काढले जाते.” बुमराहच्या या निर्णयाने त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे आणि संघाप्रती समर्पणाचे दर्शन घडले आहे.





