Yashasvi Jaiswal reverses decision to seek NOC from MCA : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागितले होते, कारण त्याने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याला समजावून सांगितले आणि यशस्वीने मुंबईसाठी खेळण्याचा निर्णय कायम ठेवला. रोहित शर्माने यशस्वीला समजावले – मुंबई मिररच्या वृत्तानुसार, रोहित शर्मानेच यशस्वीला मुंबई संघात राहण्यास प्रोत्साहित केले. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले, “रोहित शर्माने यशस्वीला सांगितले की, मुंबईसारख्या 42 रणजी करंडक जिंकलेल्या संघासाठी खेळणे हा मोठा सन्मान आहे. तसेच, मुंबईनेच तुला सुरुवातीला मंच दिला, ज्यामुळे तू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतक्या कमी वयात नाव कमावलंस. मुंबईच्या मैदानांवर तू वयाने लहान असताना क्रिकेट खेळलास, हेही विसरू नको, असे रोहितने यशस्वीला सांगितले.” म्हणून यशस्वीने आपला निर्णय बदलला – अजिंक्य नाईक अजिंक्य नाईक पुढे म्हणाले, “रोहित शर्मा आणि इतर दिग्गज खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर यशस्वीने आपला निर्णय बदलला. त्याने एमसीएला ईमेल पाठवून एनओसी मागणी मागे घेण्याची विनंती केली, जी आम्ही स्वीकारली.” यशस्वीने एप्रिल महिन्यात एमसीएकडे एनओसीसाठी अर्ज केला होता, ज्यामुळे तो गोव्यासाठी खेळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, मे महिन्यात त्याने आपली विनंती मागे घेतली आणि आता तो पुन्हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास तयार आहे. हेही वाचा – MS Dhoni : धोनी आणि CSK; अटूट बंधन, आयपीएल निवृत्तीच्या चर्चांवर प्रेमाची मोहोर, VIDEO होतोय व्हायरल जैस्वालची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी – उत्तर प्रदेशातील सुरियावन येथील रहिवासी असलेल्या जैस्वालने आपला क्रिकेट प्रवास मुंबईत सुरू केला. २०१९ मध्ये त्याने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. डावखुरा फलंदाज असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत मुंबईसाठी सात प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तो नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये ४१.१० च्या सरासरीने ४११ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वीने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ११८ धावांची खेळी साकारली होती.