Ahilyabai Holkar : राज्यपाल यांच्या अभिभाषणात महापुरुषांच्या नावांचा केवळ जयघोष केला जातो, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या वारशाचे जतन करण्याबाबत सरकारची भूमिका शून्य आहे, अशी जळजळीत टीका आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाट तेथील सरकारने तोडला असून, महाराष्ट्र सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून हा घाट पुन्हा पूर्ववत बांधून घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी विधान सभेत चर्चेदरम्यान केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाच्या महापुरुष प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, भाषणाच्या सुरुवातीला सर्व महापुरुषांची नावे मोठ्या अभिमानाने घेतली जातात, पण कृती मात्र त्याच्या उलट दिसते. अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांनी उत्तर प्रदेशात धार्मिक आणि सामाजिक बांधिलकीतून मणिकर्णिका घाटाचे बांधकाम केले होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने हा ऐतिहासिक वारसा आणि घाट उद्ध्वस्त केला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान करणारी आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून आग्रही मागणी केली की, तो घाट जसा होता तसाच पुन्हा बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. तसेच, या पुनर्रचनेचा संपूर्ण खर्च आणि नुकसान भरपाई उत्तर प्रदेश सरकारने द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक रित्या पाठपुरावा करावा. महापुरुषांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर न करता, त्यांनी निर्माण केलेला ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी सरकारने आपली ताकद वापरावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.