Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या; आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिल्या सूचना

शिंदे गटाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी रात्री काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आज ते आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘शिंदे सेनेला जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडू द्या. जे महाराष्ट्र लुटतात त्यांचं कधीही कौतुक करणार नाही’, असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेसेनेवर साधला आहे. यावेळी संजय राऊत, अरविंद सावंत, संजय जाधव , संजय देशमुख, राजाभाऊ वाजे हे खासदार त्याठिकाणी उपस्थित होते.
…जनतेचे प्रश्न सोडवा
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “तिन्ही पक्षाने फोडाफोडीच्या राजकारणाच्या पुढे जावं. त्यांना ज्यांना घ्यायचे आहेत त्यांना घ्या. पण हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवा. गेले तीन महिन्यातील महाराष्ट्रातील चित्र पाहिलं तर सुरुवातीला मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरवण्यात वेळ गेला. मग मंत्रिमंडळ विस्तार करण्यात वेळ गेला. पालकमंत्री-मालकमंत्री अजूनही वाद सुरू आहेत. यांचं स्वार्थीपण आणि हावरटपणा थांबत नाही. पण जनतेच्या प्रश्नांवर कोणी बोलत नाहीत.”
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट नाराज आहे. या सत्कार कार्यक्रमात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक देखील केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी “कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्याचा विषय आहे. त्याला संजय राऊत यांनी काल उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबतच नाही तर महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली आहे. अनेक लोकं पक्ष फोडतात. पण राग या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, दिलेलं नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं,” असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली भीती
आदित्य ठाकरे म्हणाले, “आपण लोकशाहीत राहतोय असं आपण भासवतोय, हे भासवणं दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. शिवसेना, आप किंवा काँग्रेससोबत जे झालंय, ते उद्या कदाचित बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याबाबत होईल, आरजेडी, चंद्राबाबू यांच्याबरोबरही होईल. भाजप प्रत्येक स्थानिक पक्ष फोडून भाजपाची सत्ता स्थापन करेल”, अशी भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली.
दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सक्त सूचना दिल्या. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, असे त्यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेमुळे शिवसेनेचे खासदार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.





