Aditya Thackeray : तुकाराम मुंढेंचं नाव घेत आदित्य ठाकरेचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले “भेसळयुक्त…”
Aditya Thackeray : तुकाराम मुंढे यांच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केले.

Aditya Thackeray : वरळी विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईचे कौतुक करताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंढेंच्या कामगिरीबाबत बोलताना, त्यांना निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी दिल्यास “भेसळयुक्त भाजप”ही जनतेसमोर येईल, असं मोठं वक्तव्य केलं आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, “मुंढेंना निवडणूक आयोगात आणलं तर जसं आज भेसळयुक्त दूध आणि इतर भेसळीचे प्रकार समोर येत आहेत, तसाच भेसळयुक्त भाजपही दिसायला लागेल. अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आता पक्षात मिक्सिंग आणि इथेनॉल मिक्सिंगवाले चेहरे दिसत आहेत,” असा निशाणाही साधला.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक
राजकीय टीकेपलीकडे जाऊन त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचंही तोंडभरून कौतुक केलं. “मुंढे ज्या पद्धतीने कारवाई करत आहेत, त्यातून आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, दूध, एनर्जी ड्रिंक किंवा इतर अन्नपदार्थ खरेदी करतो. त्यामध्ये भेसळ कशी आणि कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे. हा थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित विषय असून यावर व्यापक चर्चा व्हायला हवी,” असे ते म्हणाले.
राज्यात विशेष मोहिम राबवून कारवाई
दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धाडसत्र सुरू केले आहे. हॉटेलमधील अन्नसुरक्षा नियम, औषधे, वैद्यकीय साहित्य, सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवरील कारवाईसोबतच सध्या भेसळयुक्त दूध नि र्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत या संदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. तक्रार आल्यानंतर तात्काळ त्याची दखल घेत संबंधित ठिकाणी जात त्रुटी आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जात आहे.
राज्यात तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यांची कारवाईची दखल पावसाळी अधिवेशनातही घेण्यात आली. विधानसभेत अनेक सदस्यांनी त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली. तर, “लोकांचं आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून सातत्याने मांडली आहे.






