कोटा, राजस्थान: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अडचणीत सापडला आहे. पान मसाल्याच्या एका जाहिरातीसंदर्भात राजस्थानमधील ग्राहक न्यायालयाने (Consumer Court) त्याला नोटीस बजावली आहे. या जाहिरातीने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? वकील इंदर मोहन सिंह हनी यांनी कोटा ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याचा दावा आहे की, राजश्री पान मसाला बनवणारी कंपनी आणि त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेला अभिनेता सलमान खान ‘केसरयुक्त वेलची’ आणि ‘केसरयुक्त पान मसाला’ असे दावे करून ग्राहकांची दिशाभूल करत आहे. याचिकाकर्त्यानुसार, प्रति किलो सुमारे ₹४ लाख इतकी किंमत असलेला केसर, फक्त ₹५ च्या उत्पादनात समाविष्ट करणे शक्य नाही. अशा जाहिरातींमुळे तरुणांना पान मसाला खाण्यास प्रोत्साहन मिळते, जे तोंडाच्या कर्करोगाचे (Mouth Cancer) प्रमुख कारण आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाची नोटीस – या तक्रारीनंतर कोटा ग्राहक न्यायालयाने अभिनेता सलमान खानला नोटीस बजावून औपचारिक उत्तर मागितले आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेनुसार, निर्माता कंपनी आणि अभिनेता सलमान खानच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरात (Brand Endorsement) हे सलमान खान यांच्या कमाईचं एक मोठं माध्यम आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, सलमान खान एका जाहिरातीसाठी ₹४ कोटी ते ₹१० कोटी इतकी मोठी फी घेतो. याच मोठ्या कमाईमुळे, अनेक सुपरस्टार दारूपासून ते तंबाखूजन्य पदार्थांपर्यंतच्या जाहिरातींमध्ये काम करतात.