Ahilyanagar Acid Attack Case : आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एका ६ वीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृह उमटल्याचे दिसुन आले. या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सरकारला या घटनेवर तातडीने सविस्तर निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला असता, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणाच्या सखोल तपासाचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती दिली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ॲसिड शाळेच्या प्रयोगशाळेतून मिळवले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत असून, अशा घटना रोखण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे. दुसरीकडे, विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींविरुद्धचे गुन्हे रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. घटनेला काही तास उलटूनही आरोपी अद्याप मोकाट कसे, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची टिका त्यांनी केली. नाना पटोले यांनी पीडित मुलीच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करताना तिला तातडीने मुंबईत हलवून मोफत उपचार देण्याची मागणी केली. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली असून तिचे भविष्य धोक्यात आले आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले. आरोपींना अटक न झाल्याने नागरिक आणि पीडितेच्या कुटुंबात भीतीचे वातावरण असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली की, पीडित मुलीवर सध्या लोणी येथील प्रवरा मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांचा संपूर्ण खर्च विखे पाटील कुटुंबाच्या वतीने चालवण्यात येणारा ट्रस्ट उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.